काश्मीरमध्ये १४ फेब्रुवारी रोजी पुलवामा हल्ला झाल्यानंतर भारताकडून एअर स्ट्राईक केला गेला. १४ फेब्रुवारी पासून ते २७ फेब्रुवारीच्या एअर स्ट्राईकपर्यंत भाजप राष्ट्रभक्तीचे राजकारण करत असल्याचा स्ट्राईक मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केला आहे. पुलवामा हल्ला झाल्यानंतर मोदी रोज वेगवेगळ्या पोजमध्ये हसत असल्याचे फोटो द टेलिग्राफने छापलेले आहेत. हे फोटो बघून मोदी फकीर नाहीत बेफिकीर असल्याचे दिसत असल्याची घणाघाती टीका राज ठाकरे यांनी केली आहे.
एअर स्ट्राईकनंतर भाजपकडून रोज नवेनवे दावे केले जात आहेत. कोण म्हणतो २५० मारले तर कोण म्हणतो ३०० मारले. भाजपचे नेते काय पायलट होते का? भारतीय जवानांनी योग्य एअर स्ट्राईक केला. मात्र त्यांना चुकीची जागा दाखवली गेली होती. जवानांना बॉम्ब जंगलात टाकायला लावले, असेही राज ठाकरे म्हणाले आहेत.
तर अभिनंदन परत आला नसता…
एअर स्ट्राईकमध्ये भारताने जर १० दहशतवादी जर मारले असते तर पाकिस्तानने अभिनंदनला परत सोडले नसते. भाजपला निवडणुक जिकांयची आहे, म्हणून यांच्याकडून जवानांचा वापर होत आहे.
राफेलचे काम अनिल अंबानीला का दिले?
भाजप जेव्हा विरोधात होते, तेव्हा बोफोर्स घोटाळ्यावर बोलत होते. मग राफेलचे काम कोणताही अनुभव नसलेल्या अनिल अंबानीच्या कंपनीकडे का दिला? असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला. राफेलच्या दरात तीन वर्षात पाचशे कोटीचे १६०० कोटी कसे झाले? काँग्रेसने काय राफेलचा फक्त सांगाडा बनवला होता का? सुप्रीम कोर्टात राफेलच्या विरोधात याचिक दाखल केलेली असताना संरक्षण मंत्रालयातून राफेलचे पेपर चोरीला गेलेच कसे? असाही प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला.