आषाढी एकादशीनिमित्ताने विठ्ठल-रखुमाई यांची शासकीय महापूजा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काल, सोमवारी दुपारी सपत्नीक पंढरपूरकडे रवाना झाले होते. मुसळधार पाऊस असल्यामुळे विमानाने पंढरपूरला जाणे शक्य नसल्यामुळे मुख्यमंत्री रस्ते मार्गानेच पंढरपूरकडे रवाना झाले होते. यंदाही मुख्यमंत्री स्वत: गाडी चालवत भर पावसात पंढरपूराला निघाले. नेहमीची मर्सिडीज ऐवजी रेंज रोव्हर गाडीने मुख्यमंत्री पंढरपूरकडे रवाना झाले होते. आता देखील रस्ते मार्गानेच पुन्हा मुंबईकडे मुख्यमंत्री परतत आहेत. याच पार्श्वभूमीवर सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर खोचक टीका केली आहे.
संदीप देशपांडे ट्वीट करत म्हणाले की, ‘हे बा विठ्ठला जसे आमचे मुख्यमंत्री स्वतः गाडी चालवत तुझ्या भेटीला आले तसेच स्वतः गाडी चालवत मंत्रालयात सुद्धा जाऊदे. आणि जशी तुझी भेट घेतली तशी एकदा जनतेशी पण भेट घेउदे हीच तुझ्या चरणी प्रार्थना. पांडुरंग… पांडुरंग..’
हे बा विठ्ठला जसे आमचे मुख्यमंत्री स्वतः गाडी चालवत तुझ्या भेटीला आले तसेच स्वतः गाडी चालवत मंत्रालयात सुद्धा जाऊदे. आणि जशी तुझी भेट घेतली तशी एकदा जनतेशी पण भेट घेउदे हीच तुझ्या चरणी प्रार्थना. पांडुरंग… पांडुरंग..
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) July 20, 2021
विठ्ठल-रखुमाई यांच्या महापूजेला उपस्थित राहण्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं दुसरं वर्ष आहे. आज पहाटे ३ वाजून ४० मिनिटांनी विठ्ठल-रखुमाई यांची मुख्यमंत्र्यांकडून सपत्नीक महापूजा करण्यात आली. यावर्षी मुख्यमंत्र्यांसोबत महापूजा करण्याचा मान कोलते दाम्पत्याला मिळाला. केशव कोलते आणि पत्नी इंदूबाई कोलते यांच्या समवेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी विठ्ठल-रखुमाई यांची शासकीय महापूजा केली. दरम्यान पंढरपुरात पोहोचल्यानंतर मुख्यमंत्री यांनी विश्रांती न घेता सोलापूरमधील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला.
हेही वाचा – Ashadhi Ekadashi 2021: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठलाची शासकीय महापूजा पार पडली