घरमहाराष्ट्रनाशिकसप्तशृंग गडवासियांची पाण्यासाठी वणवण

सप्तशृंग गडवासियांची पाण्यासाठी वणवण

Subscribe

पाणीपुरवठा करणार्‍या भवानी पाझर तलावाने गाठला तळ

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान उत्तर महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंगगडावर पाणीपुरवठा करणार्‍या भवानी पाझर तलावाने तळ गाठल्याने गेल्या दहा दिवसांपासून येथील पाणीपुरवठा ठप्प झाला असून सप्तशृंगगडवासियांना पाण्यासाठी वणवण करत भटकंती सुरू झाली आहे.

गतवर्षी व यावर्षी चैत्र उत्सव यात्रा कोरोना साथीच्या रोगांमुळे प्रशासनाने रद्द केला होता. तसेच ग्रामपंचायतीच्या वतीने पाण्याचे योग्य नियोजन करण्यासाठी चार दिवसांआड पाणीपुरवठा केला जात होता व यात्रा नसल्याकारणाने थोड्याफार प्रमाणात पाण्याची बचत झाली होती.परंतु गेल्या दहा दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प झाल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण पहावयास मिळत आहे. गेल्या वीस ते पंचवीस वर्षांपासून भवानी पाझर तलावाला पाणी गळतीचे जणू संकटच उभे राहिले आहे. काही वर्षांपूर्वी पाणी झिरपून जाऊ नये यासाठी ट्रस्टने लाखो रुपये खर्च करून त्यात प्लास्टिक टाकले होते परंतु त्याचा कुठलाच उपयोग न झाल्याने पाणी झिरपणे सुरूच राहिले. तसेच मागील दोन ते तीन वर्षापूर्वी या पाझर तलावाचे गळती थांबवण्यासाठी तब्बल अडीच कोटी रुपये खर्च करण्यात आले. परंतु गळती न थांबता कोट्यवधी रुपये पाण्यात झिरपून गेले. या अडीच कोटी रुपये पूर्ण वाया गेल्याचे गळती द्वारे चित्र स्पष्ट झालेले पाहायला मिळत आहे. दरवर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वी भवानी पाझर तलावाचा गाळ काढला गेला पाहिजे परंतु तसे होत नाही. गेल्या बर्‍याच वर्षांपासून पाझर तलावातला गाळ काढला गेला नाही. मोठ्या प्रमाणावर गाळ साठला आहे. पाऊस पडण्यापूर्वी जर ग्रामपंचायतीने लक्ष घालून दरवर्षी गाळ काढला तर थोड्याफार प्रमाणात का होईना पाणीटंचाई दूर होईल.

- Advertisement -

धरणाचे काम जेव्हा चालू होईल तेव्हा होईल तोपर्यंत पाण्याचे काय नियोजन असा संतप्त सवाल येथील महिला वर्गाकडून केला जात आहे. येथील ग्रामस्थांना तसेच वयोवृद्ध महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. तसेच नाईलाजाने हजार ते बाराशे रुपये देऊन टँकरवाल्यांकडून पाणी विकत घ्यावे लागत असल्याचे विदारक चित्र येथे पहावयास मिळत आहे. एकीकडे कोरोना संसर्गामुळे प्रशासनाने सर्व धार्मिक स्थळे बंद केली आहेत. येथील व्यवसाय बंद आहेत. पैसे आणायचे तरी कुठून अशी अवस्था येथील ग्रामस्थांची झाली आहे. सप्तशृंगीगड हे पावसाचे माहेरघर समजले जाते, परंतु यंदा जुलै महिना अर्धा उलटूनही वरूण राजाने गडाकडे पाठ फिरवली आहे. याची खंत ग्रामस्थ करीत आहे. ग्रामस्थांची पाण्यासाठीची परवड थांबवावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अन्यथा गडावर पाण्याचे टँकर सुरू करावे अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -