पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी मंत्रिमंडळाचा विस्तार केला. काल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ४३ मंत्र्यांना राष्ट्रपती भवनात गोपनियतेची शपथ दिली. मोदींच्या मंत्रिमंडळात ३६ नव्या चेहऱ्यांना सामाविष्ट करण्यात आलं. तसंच, महाराष्ट्रातून ४ नेत्यांना मंत्रिपद देण्यात आलं. यात खासदार नारायण राणे, डॉ. भागवत कराड, कपिल पाटील आणि डॉ. भारती पवार यांना मंत्रिपद देण्यात आलं.
महाराष्ट्रातून चार नेत्यांना केंद्रात मंत्रीपद दिलं असताना दुसरीकडे प्रितम मुंडे यांना डावलल्याची चर्चा रंगली आहे. दरम्यान प्रितम मुंडे यांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने भाजप नेत्या पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा आहे. शपथविधी पार पडल्यानंतर पंकजा मुंडे आणि प्रितम मुंडे यांनी अभिनंदनाचं ट्वीटदेखील केलं नसल्याने या चर्चेला बळ मिळालं आहे. दरम्यान, नाराजीच्या चर्चांनंतर भाजकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी नाराजीचे वृत्त फेटाळून लावले.
पंकजा मुंडे नाराज नाहीत – भाजप
“अभिनंदन केलं नाही किंवा ट्विट केलं नाही असं सांगताना त्यांनी कुठे नाराजीदेखील व्यक्त केलेली नाही याकडेही लक्ष द्यावं लागेल,” असं प्रवीण दरेकर म्हणाले. तर देवेंद्र फडणवीस यांनी हे वृत्त फेटाळताना विनाकारण त्यांना अशा चर्चा करुन बदनाम करु नका, असं म्हटलं.