लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या एवढंच कर्तुत्व स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं आहे. अण्णा भाऊ साठे आणि सावरकरांचं कर्तुत्व समान असून या दोघांमध्ये मला मला काहीही फरक दिसत नाही, असं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केलं. विवेक साप्ताहिकाच्या एका कार्यक्रमाला संबोधित करताना त्यांनी हे मत व्यक्त केलं आहे.
अण्णा भाऊ साठे यांच्या प्रमाणेच सावरकरांचं कर्तृत्व होतं. मला अण्णा भाऊ साठे आणि सावरकरांमध्ये कोणताही फरक दिसत नाही, असं मत व्यक्त करताना अण्णा भाऊ साठे हे एक धार्मिक व्यक्तीमत्त्व होतं, असं देखील भागवत म्हणाले. अण्णा भाऊ साठे यांनी सत्याची तपश्चर्या केली. सत्य, करुणा, सुचिता आणि तपस्या या चार शब्दात त्यांचं पूर्ण जीवन होतं, असं भागवत म्हणाले.
अण्णा भाऊ साठे यांचं कार्य मोठं आहे. प्रामाणिकता हा त्यांचा मोठा गुण होता. आजच्या जगात प्रामाणिकता हा गुण दुर्मिळ होत चालला आहे. पण तो त्यांच्याकडे होता. अण्णा भाऊ साठे जन्मापासून ते मृत्यूपर्यंत प्रामाणिकपणे जगले. प्रामाणिकपणा हा जन्मजात असावा लागतो, असं म्हणत त्यांच्या एवढा प्रामाणिकपणा आमच्या पुढारी मंडळींमध्ये आला तर देश कित्येक पटीने पुढे जाईल, असं मत भागवत यांनी व्यक्त केलं.