साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखान्यावर अंमलबजावणी संचलनालय (ED) जप्ती आणल्यानंतर या कारखान्याच्या संस्थापक आणि माजी संचालक शालिनीताई पाटील यांनी या संपुर्ण प्रकरणावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. आमच्या जरंडेश्वर साखर कारखान्याचा कर्जाचा हप्ता भरण्यासाठी थोडा उशीर झाला होता. अवघ्या तीन कोटींचा हफ्ता शिल्लक असताना त्यांनी कारखाना विकला. आमच्या अकाऊंटमध्ये ८ कोटी ३४ लाख जमा होते. त्यामुळे ते पैसे वळवण्याची विनंती करूनही दुर्लक्ष करण्यात आले. सरकारची आमच्या कर्जाला हमी होती. त्यामुळे सरकारकडे जाता आले असते. पण बॅकेत अजित पवार, खरेदी करणारे अजित पवार यांच्यामुळे आम्ही काहीही करू शकलो नाही. अजित पवारांनी सत्तेचा दुरूपयोग करत पुरेपूर गैरफायदा घेतला. त्यामुळे २५ हजार कोटींचा भ्रष्टाचार अजित पवारांच्या काळात झाला असा आरोप शालिनीताई पाटील यांनी केला आहे.
ED ची कारवाई थोडी उशिराने झाली
देवाच्या काठीला आवाज नसतो. शंभर अपराध भरले की फटका बसतोच अशी प्रतिक्रिया शालिनीताई पाटील यांनी दिली आहे. जरंडेश्वर साखर कारखान्याचा लिलाव झाला तेव्हा घाडगे यांनी हा कारखाना खरेदी केला होता. या संपुर्ण लिलाव प्रक्रियेला शालिनीताई पाटील यांनी न्यायालयात आव्हान दिले. पण आता ईडी चौकशीच्या निमित्ताने आता कारवाई केल्याने आम्हाला न्याय मिळाला अशीही प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. याआधी २०१९ मध्ये अण्णा हजारे, माणिकराव जाधव, अरोरा आणि शालीनीताई पाटील यांनी अर्ज केला. अरोरा यांनी नंतर माघार घेतली. त्यामुळे ईडीने या प्रकरणात एफआयआर दाखल केला. पण कारवाई न झाल्याने दुसऱ्यांदा अर्ज करण्यात आला. ईडीने आम्हाला पाठिंबा दिला. भ्रष्टाचार झाल्याचे त्यांनी मान्य केले. त्यामुळे एकुण २७ हजार सभासदांना न्याय मिळाल्याचेही शालीनीताई पाटील यांनी सांगितले.