बेळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी काही भाग पाण्याखील गेल्याने मुंबई बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. त्यामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून कोल्हापूर पोलिसांनी या महामार्गावरील वाहतूक थांबवली आहे. परिणामी महाराष्ट्रातून बंगळुरूच्या दिशेने जाणारी सर्व वाहतूक ठप्प झाली आहे. कोल्हापूरात पंचगंगेने धोक्याची पातळी गाठल्याने कोल्हापूरात अनेक ठिकाणी पूराची परिस्थिती आहे. कोल्हापूरच्या कागलपासून पुढे जाणारी वाहतूक पोलिसांनी रोखून धरली आहे. याठिकाणी पाण्याची वाढलेली पातळी पाहूनच ही वाहतूक पोलिसांकडून रोखून धरण्यात आली आहे. महाराष्ट्रातून कर्नाटकच्या दिशेने जाणारी संपुर्ण वाहतूक थांबवण्यात आली आहे.
कोल्हापूरचे पोलिस अधिक्षक शैलेश बलकवडे यांनी दिलेल्या माहितनुसार कागलच्या पुढे काही भाग हा पाण्याखाली गेलेला आहे. त्यामुळेच कोल्हापूरापासून पुढे जाणारी वाहतूक थांबवली आहे असेही त्यांनी सांगितले. पंचगंगा नदीची वाढणारी पातळी पाहता या दिशेने जाणारी वाहतूक थांबवल्याचे त्यांनी सांगितले. पंचगंगेने सकाळीच ४३ फुटाची पातळी गाठली आहे. अतिवृष्टीमुळे कोल्हापूरातील एकुण ४७ गावाचा संपर्क तुटला आहे. आतापर्यंत एकुण ९६५ कुटूंबांना स्थलांतरीत करण्यात आले आहे. आतापर्यंत अनेक ठिकाणी बचावकार्याला सुरूवात झाली असून एनडीआरएफच्या टीममार्फतही अनेक ठिकाणी बचावकार्याला सुरूवात झाली आहे.
राज्यात एनडीआरएफच्या एकुण १८ टीम तैनात करण्यात आल्या आहेत. त्यापैकी ४ टीम चिपूळून, ३ महाडमध्ये कार्यरत झाल्या आहेत. तर इतर टीम या पालघर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सिंधुदुर्ग, नागपूर, ठाणे आणि मुंबई याठिकाणी पाचारण करण्यात आल्या आहेत. कोल्हापूरात एनडीआरएफ मार्फत बचावकार्याला सुरूवात झाली आहे.
कर्नाटकच्या अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवला
कर्नाटकच्या अलमट्टी धरणातून केल्या जात असलेल्या विसर्गाचा वेग आणखी वाढवण्यात आला आहे. अल्मट्टी धरणातून होणारा विसर्ग वाढवून 2 लाख क्यूसेक करण्यात आला आहे. अल्मट्टी धरणाचे 26 दरवाजे सकाळी 10 वाजता उघडण्यात आले. या दरवाज्यातून तब्बल 1 लाख 57 हजार 500 क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तर पॉवर हाऊसच्या माध्यमातून देखील 42 हजार 500 क्यूसेक गतीने विसर्ग सुरू आहे. या विसर्गामुळे कोल्हापूर आणि सांगलीला मोठा दिलासा मिळणार आहे.