घरताज्या घडामोडीब्रुक फार्मा कंपनीच्या संचालकाला पोलिसांनी घेतले ताब्यात, विरोधी पक्षनेते फडणवीस, दरेकर डीसीपी...

ब्रुक फार्मा कंपनीच्या संचालकाला पोलिसांनी घेतले ताब्यात, विरोधी पक्षनेते फडणवीस, दरेकर डीसीपी कार्यालयात दाखल

Subscribe

नवाब मलिकांना जनतेचे घेण-देण नाही - फडणवीस 

राज्यात कोरोनाबाधितांची संख्या प्रचंड वाढली आहे. कोरोनाबाधित रुग्णांना लवकर बरे करण्यासाठी रेमडेसिवीर इंजेक्शनची मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. परंतु रेमडेसिवीर इंजेक्शनचा राज्यासह देशात तुटवडा निर्माण झाला आहे. रेमडेसिवीरच्या पुरवठ्यावरुन राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये शनिवारी(१७ एप्रिल) दिवसभर आरोपांच्या फैरी झडल्या होत्या. यांनतर आता दमणमधील रेमडेसिवीर इंजेक्शनची निर्मिती करणाऱ्या ब्रुक फार्मा कंपनीच्या संचालकाला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. निर्यात बंदी असल्यामुळे या कंपनीकडे २० लाख रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा पडून असल्याचे आढळले आहे. या संचालकाला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतल्या नंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर DCP कार्यालयात दाखल झाले आहेत.

ब्रुक फार्मा ग्रुप कंपनीचे मालक राजेश जैन यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेत, पोलीस उपायुक्तांच्या कार्यालयात नेण्यात आले. यानंतर राज्याचे विधासभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि आमदार प्रसाद लाड DCP कार्यालयात दाखल झाले होते. काही दिवसांपूर्वी दरेकरांनी दमनम दौरा केला होता. यावेळी प्रसाद लाडही होते या दौऱ्यामध्ये त्यांनी राज्याला ५० हजार रेमडेसिवीर देणार असल्याची घोषणा केली होती. याबाबत त्यांनी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री रांजेंद्र शिंगणे यांच्याशी परवानगी बाबत चर्चा केली होती. परंतु त्याच कंपनीच्या संचालकाला ताब्यात घेतल्याने आता रेमडेसिवीरवरुन सुरु असलेल्या वादामध्ये ठिणगी पडली आहे. त्यामुळे आता संचालकांवर काय कारवाई होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

- Advertisement -

नवाब मलिकांना जनतेचे घेण-देण नाही – फडणवीस 

अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक आणि काही मंत्र्यांना लोकांच्या जीवाचे काही घेण-देण नाही आहे. यांना फक्त राजकारण करायचे आहे. मलिक यांनी केलेल्या आरोपांवर केंद्रीय मंत्री मांडविया यांनी प्रत्युत्तर दिले होते. त्यांनी कंपन्यांची नावे सांगण्यास सांगितले होते परंतु कोणत्याही कंपन्यांचे नाव मलिक यांनी सांगितले नाही. उलट केंद्र सरकार महाराष्ट्राला मदत करते आहे. परंतु राज्य सरकारमधील मंत्री आपली जबाबदारी दुसऱ्याच्या खांद्यावर टाकण्याचे काम करत असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

चार दिवसांपूर्वी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि आमदार प्रसाद लाड दमनमधील ब्रुक फार्मा कंपनीत गेले होते. यावेळी त्यांनी ब्रुक फार्माच्या संचालकांना महाराष्ट्रात रेमडेसिवीर इंजेक्शन देण्याची मागणी केली होती. यावर संचालकांनी सांगितले की इंजेक्शनचा पुरवठा करु मात्र आम्हाला परवानगी नाही. यानंतर केंद्र सरकारमधील मंत्री मनसुख मांडविया यांच्याशी संपर्क केला आणि महाराष्ट्रात रेमडेसिवीर इंजेक्शन पुरवठ्यासाठी एक्सपोर्ट लायसन्स देण्याची मागणी केली. यानंतर मांडविया यांनी रेड्डीज सोबत संपर्क करुन दिला. यानंतर दोन्ही राज्यातील एफडीए कडून परवानगी मिळवली होती यामुळे रेमडेसिवीर इंजेक्शन महाराष्ट्राला मिळणार होते. परंतु महाराष्ट्राच्या एफडीएचे अधिकाऱ्यांच्या पीएने त्यांना फोन करुन धमकावले की विरोधकांना कसे काय तुम्ही माल देत आहात आम्हाला दिले पाहिजे.

- Advertisement -

यानंतर आम्ही त्यांच्याशी संपर्क साधला आमच्याकडे त्याचा रेकॉर्ड आहे. यानंतर फार्मा कंपनीच्या संचालकांच्या घरी जाऊन १० पोलिसांनी अटक केली आहे. आम्ही DCP ची भेट घेतली त्यांना सांगितले, माल पुरवण्याची एफडीए कडून त्यांनी परवानगी घेतली आहे. यावर अधिकारी बोलले की, आम्ही माहितीच्या आधारे यांना विचारपूस करण्यासाठी घेऊन आलो आहोत असे विरोधी पक्षनेते देवेद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. ब्रुक फार्मा कंपनीच्या संचालकांना आता सोडण्यात आले आहे त्यांना अटक केली नसून चौकशीसाठी घेऊन आलो असल्याचे पोलीस म्हणाले असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

फडणवीस यांनी पुढे म्हटले आहे की, हे गलिच्छ प्रकारचे राजकारण आहे. आम्ही सुद्धा महाराष्ट्रासाठी प्रयत्न करत आहोत. ब्रुक फार्मा कंपनीच्या संचालकांना केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी मोठ्या प्रमाणात इंजेक्शनची निर्मिती करण्यास सांगून महाराष्ट्राला अधिक रेमडेसिवीर इंजेक्शन देण्यास सांगितले होते. परंतु त्यांना अशा प्रकारचा त्रास देण्यात येत आहे. हे राजकारण सुरु असून वाईट असल्याचे फडणवीसांनी म्हटले आहे.

अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिकांनी केला होता आरोप 

अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी निर्यातदार कंपन्यांचा दाखला देत रेमडेसीवीरच्या पुरवठ्यावरून केंद्र सरकारवर निशाणा साधला. राज्य सरकारने १६ निर्यात कंपन्यांकडे रेमडेसिवीरबाबत विचारणा केली असता केंद्राने महाराष्ट्रात रेमडेसिवीरचा पुरवठा करण्यास बंदी घातल्याचे सांगण्यात आले. महाराष्ट्राला रेमडेसिवीर दिल्यास परवाना रद्द करण्याची धमकी कंपन्यांना देण्यात आल्याचे मलिक म्हणाले. केंद्र सरकारने रेमडेसिवीरच्या निर्यातीवर बंदी घातल्यानंतर देशातील १६ निर्यातदारांकडे २० लाख रेमडेसिवीरच्या कुपी आहेत. निर्यातदारांना या कुप्यांची विक्री करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली नसल्याचे मलिक यांनी सांगत केंद्रावर गंभीर आरोप केले होते.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -