महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार नारायण राणे भाजपमध्ये प्रवेश कधी करणार?, अशी चर्चा अनेक दिवसांपासून सुरु असतानाच ‘नारायण राणेंबद्दल योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ’,अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे.
आता पुढचा मुहूर्त केव्हा
गेल्या काही दिवसांपासून नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू आहे. मात्र, त्यांना आपल्या पक्षात घेण्याचा मुहूर्त काही भाजप नेत्यांना सापडत नाही. तर दुसरीकडे शिवसेनेचा विरोध असल्यानेच राणेंचा पक्ष प्रवेश लांबणीवर पडत असल्याचे बोलले जात आहे. एवढेच नाही तर कोकणातील भाजपच्या स्थानिक नेत्यांनी देखील राणेंना पक्षात घेऊ नका, असे मुख्यमंत्र्यांना सांगितल्याचे समजत आहे. त्यामुळे राणेंच्या पक्ष प्रवेशासाठी येणार्या अडचणी कधी दूर होणार आणि राणेंचा पक्ष प्रवेश कधी होणार याची चिंता आता राणे समर्थकांना देखील लागली आहे.
आरे संदर्भात विरोधकांना टोला
‘आरेमध्ये होणाऱ्या प्रस्तावित मेट्रो कारशेडसाठी २ हजार ७०० झाडे तोडण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात मुंबईकर जनतेमध्ये प्रचंड आक्रोश असताना आज पुन्हा एकदा आरे संदर्भातला मुद्दा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडला. दरम्यान, फडणवीस यांनी आरेला विरोध करणाऱ्यांना पुन्हा एकदा टोला लगावला आहे. ‘कारशेडला विरोध करणारे वेगळ्या मनसुब्याने काम करत आहेत का? हे तपासून पहायला हवे’, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना टोला लगावला आहे.
हेही वाचा – कॉर्पोरेट टॅक्स कमी केल्याने उद्योगांना दिलासा – मुख्यमंत्री