नाशिक : महापालिकेपाठोपाठ जिल्हा परिषद व पंचायत समित्यांचा प्रारुप आराखडा तयार करण्याचे आदेश निवडणूक विभागाने दिल्यानंतर जिल्ह्यातील साधारणत: 8 ते 10 तालुक्यांमध्ये तब्बल 11 गट वाढणार आहेत. निवडणूक विभाग या गटांचा प्रारुप आराखडा शनिवारी (दि.5) राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाने गट व गण रचनांचा प्रारुप आराखडा शनिवार (दि.5) पर्यंत ई-मेलद्वारे पाठवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्हा परिषदेचे 73 गट व 15 पंचायत समित्यांचे 146 गणांची फेररचना करण्यात येत आहे. 2011 च्या लोकसंख्येनुसार 40 हजारांवर मतदार असलेल्या गटांची विभागणी करुन नवीन गट तयार केला जाणार आहे. यात प्रामुख्याने निफाड तालुक्यात पिंपळगाव बसवंत किंवा पिंपळद हा नवीन गट निर्माण होऊ शकतो.
या तालुक्यात दोन गट अस्तित्वात येण्याची शक्यताही आहे. निफाड तालुक्यात दोन गट वाढण्याची शक्यता असताना ओझर गटाविषयी न्यायालयाचे आदेश प्राप्त न झाल्यामुळे ओझरसह एकूण सदस्यांची संख्या 84 होणार आहे. त्र्यंबकेश्वर, सिन्नर, येवला, नाशिक, बागलाण, चांदवड, सुरगाणा, दिंडोरी व मालेगाव येथे प्रत्येकी एक गट निर्माण होऊ शकतो. लोकसंख्येच्या प्रमाणात गटांची रचना होणार असली तरी आपल्याला अनुकूल असलेली गावे तुटायला नको म्हणून इच्छुकांचे प्रारुप आराखड्याकडे लक्ष लागून आहे. तसेच ओबीसी आरक्षणाच्या निर्णयावर इच्छुकांची उमेदवारी निश्चित होईल.
गट वाकड्यात घुसायला नको म्हणून…
आपल्याला अनुकूल असलेला गट ‘वाकड्यात’ घुसायला नको म्हणून विद्यमान सदस्यांसह इच्छुकांनी प्रारुप आराखड्यावर लक्ष ठेवले आहे. आमदार किंवा विरोधक आपल्याला अनुकूल नसलेली गावे गटाला जोडतील अशी भितीही अनेकांना आहे. तसेच अनुकूल असलेली गावे तोडली जाण्याची शक्यताही वाढल्याने इच्छुकांची झोप उडाल्याचे चित्र झेडपीत दिसते.