नाशिक : उत्तर महाराष्ट्रातील नाशिकसह धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यात थंडीची लाट येणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे. उत्तरेकडून येणार्या शीतलहरींमुळे वातावरणातील तापमानात घट होण्याची शक्यता आहे. दोन दिवसांनंतर पश्चिमी वार्यांचा प्रभाव वाढून काही ठिकाणी पाऊस तर, काही ठिकाणी गारपीटीचा अंदाजही वर्तविण्यात आला आहे.
पुणे वेधशाळेकडून राज्यातील 9 जिल्ह्यात पुढील 24 तासांत कडाक्याच्या थंडीचा इशारा देण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिकसह औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, या जिल्ह्यांत थंडीची लाट येण्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे. वाढत्या थंडीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले.
पुढील 48 तासांमध्ये उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तविला आहे. गेल्या दोन दिवसांपासून सकाळच्या सुमारास थंडीचा कडाका, तर दुपारी ऊन असा अनुभव नागरिक घेत आहेत. फेब्रुवारी उजाडूनही यंदा थंडी कायम असल्याने शेतकर्यांचे लक्ष तापमानवाढीकडे लागले आहे.
फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात पावसाचा अंदाज
उत्तरेकडून येणार्या शीत लहरींच्या वार्यामुळे वातावरणातील तापमानात घट होण्याची शक्यता आहे. दोन दिवसानंतर पश्चिमी वार्याचा प्रभाव वाढून काही ठिकाणी पाऊस तर, गारपिटीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार असल्याचाही अंदाज हवामान केंद्राने वर्तविला आहे.