प्रमोद उगले, नाशिक ग्रामीण भागात पाण्याचा पुरवठा करणार्या जलसाठ्यांचे सर्वेक्षण करून पाण्याची गुणवत्ता सातत्याने तपासणी होत असल्याने जिल्ह्यातील दूषित पाण्याचे प्रमाण अवघ्या तीन वर्षांत २० टक्क्यांवरुन ४ टक्यांपर्यंत घसरले आहे. विशेष म्हणजे, या तीन वर्षांच्या कार्यकाळात जिल्ह्यात एकही साथरोग मृत्यू झालेला नाही.दूषित पाण्यामुळे साथरोगांचा प्रादूर्भाव वाढतो. अतिसार,उलट्यांसारख्या इतर जलजन्य आजारांमुळे ग्रामीण भागात पावसाळ्यात साथरोगासारखी परिस्थिती निर्माण होते.
त्यामुळे जिल्ह्याच्या पाणी गुणवत्ता व सहनियंत्रण विभागाच्या माध्यमातून जलसाठ्यांचे सहा महिन्यांनी सर्वेक्षण केले जाते. पाण्याचे नमूणे भूजल सर्वेक्षण विभागाकडे देवून पाण्याची गुणवत्ता तपासली जाते. पाणी दूषित आढळले, तर त्या ग्रामपंचायतीशी संपर्क साधून पाण्यात टीसीएल अर्थात टॅपिकल क्लोराईड लाईन मिश्रीत केले जाते. या टीसीएल पावडरमध्ये आमोनिया वायू असतो.
त्याची क्लोरिन पाण्यात मिश्रीत केल्यानंतर रासायनिक क्रिया घडते आणि पाणी स्वच्छ होते. अशाच पध्दतीने सार्वजनिक पाणवठ्यावर पाणी स्वच्छ केले जाते. त्यासाठी पाणी गुणवत्त व सहनियंत्रण विभागाने प्रत्येक गावातील पाच महिलांना पाणी सर्वेक्षणाचे प्रशिक्षण दिले आहे. पाच वर्षे गावात कुठलाही साथरोग आढळला नाही, तर त्या गावाला पालकमंत्री, जिल्हा परिषद अध्यक्ष व जिल्हा परिषद सीईओंच्या हस्ते चंदेरी कार्ड भेट दिले जाते.
जिल्ह्यातील एकूण 1380 पैकी तब्बल एक हजार 10 ग्रामपंचायतींना आतापर्यंत हे कार्ड वाटप झाले आहे. उर्वरित ग्राम पंचायतींना लाल, पिवळे व हिरवे कार्ड देण्यात आले असून तेथील पाण्याचे नमूने प्रत्येक सहा महिन्यांनी तपासले जातात. पाणी गुणवत्ता विभागाने जानेवारी महिन्यात केलेल्या सर्वेक्षणात 15 तालुक्यांमधील एक हजार 190 ठिकाणी पाण्याचे नमूने तपासले. त्यात 43 नमुने दूषित आढळले आहेत.
सुरगाणा व त्र्यंबकेश्वर या दोन तालुक्यांमध्ये सर्वाधिक दूषित पाणी आढळले आहे.
त्र्यंबक, सुरगाण्यात दूषित पाणी
पाणी गुणवत्ता सहनियंत्रण विभागाने जिल्ह्यातील एक हजार 190 ठिकाणी पाण्याचे नमूने तपासले आहेत. त्यापैकी त्र्यंबकेश्वरमध्ये 13 व सुरगाणा तालुक्यात 14 ठिकाणी दूषित पाणी आढळले आहे. त्यापाठोपाठ बागलाण आणि इगतपुरी या तालुक्यांचा क्रमांक लागतो. विशेष म्हणजे कळवण, मालेगावसह 9 तालुक्यांमध्ये एकाही ठिकाणी दूषित पाणीपुरवठा झालेला दिसून येत नाही.