‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’चा जयघोष करत गेल्या दहा दिवसांपासून घराघरांत आणि सार्वजनिक मंडळांत विराजमान झालेल्या गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यात आला.
पृथ्वीतलावर आलेले कोरोनाचे विघ्न दूर करण्याची प्रार्थना प्रत्येक गणेश भक्ताने बाप्पासमोर केली. मुंबईमध्ये समुद्र किनार्यांवर तर नाशिकमध्ये गोदातीरावरील २३ ठिकाणी तर ४३ कृत्रीम तलावांमध्ये मूर्ती विसर्जीत करण्यात आल्यात. मूर्ती दान करण्याच्या उपक्रमासह भरभरुन प्रतिसाद लाभला. महत्त्वाचे म्हणजे यंदा घरातील भांड्यांमध्ये शाडू मातीच्या मूर्तींचे विसर्जन करण्याचे प्रमाण कमालीचे वाढले. यंदा ढोलताशांचा गजर आणि मिरवणूक नसल्यामुळे विसर्जनाचा सोहळा काहीसा सुना-सुना होता. घरोघरी मात्र गेल्या दहा दिवस उत्साह टिकून राहिलेला दिसला. बाप्पाच्या विसर्जनानंतर, ‘रिकामं झालं घर, रिता झाला मखर, पुढच्या वर्षी लवकर येण्यास निघाला लंबोदर’ अशी भावना रविवारी प्रत्येक गणेश भक्ताच्या मनात होती.