नाशिक: ग्लोबल निती आणि देशातील काही कॉर्पोरेट कंपन्यांच्या फायद्यासाठीच सरकारने कृषी कायदे तयार केले. शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्यासाठी दिल्ली येथे शेतकर्यांनी दीर्घकाळ चालणारे आंदोलन छेडले. दिल्लीच्या आंदोलनाला एक मोठी परंपरा असून पंजाबी शेतकर्यांनी वेळोवेळी ब्रिटिश सरकारच्या विरोधात आंदोलन केले असल्यामुळे दिल्लीचे आंदोलन यशस्वी झाल्याचे प्रतिपादन दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाचे सक्रिय ज्येष्ठ नेते व पंजाबी साहित्यिक सुखदेवसिंग शिरसा यांनी केले.
महाकवी वामनदादा कर्डक साहित्यनगरीत सुरू असलेल्या १६ व्या विद्रोही साहित्य संमेलनात शिरसा यांची विशेष मुलाखत पार पडली. कादंबरीकार राकेश वानखेडे आणि राज देवांत यांनी शिरसा यांची मुलाखत घेतली. यावेळी शिरसा यांनी दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचे विविध पैलू उलगडून दाखविले.
हरियाणाच्या महिला कधीही बाहेर येत नाहीत, मात्र हरियाणाच्या शेकडो तरुणी ट्रॅक्टर घेऊन आंदोलनाच्या सहभागी झाल्या. इतक्या मोठ्या संघर्षात कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. सरकारने आंदोलन दडपण्याचा मोठा प्रयत्न केला. मात्र, शेतकरी आपल्या मागणीवर ठाम होते, असेही ते म्हणाले. सूत्रसंचालन प्रणाली मगर यांनी केले.