नाशिक:महापालिकेने सुमारे अठरा वर्षांवरील १३ लाख ६३ हजार ७०० नागरिकांचे लक्ष लसीकरणासाठी निश्चित केले होते. त्यापैकी गेल्या अकरा महिन्यांच्या कालावधीत १२ लाख ०४ हजार ९९३ नागरिकांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. शहरात एक लाख तीस हजार ४११ नागरिकांनी पहिला डोस घेवून ८४ दिवस उलटले तरी लसीकरण केंद्राकडे पाठ फिरविली आहे. पहिला डोस घेतलेल्या नागरिकांचे प्रमाण ८८ टक्के आहे, तर दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांचा टक्का ५७ वर पोहोचला आहे.
ओमायक्रॉनच्या रुपाने तिसरी लाट येण्याची शक्यता निर्माण झाल्यानंतर शहरात लसीकरणाला वेगाने सुरुवात झाली आहे. ओस पडू लागलेली लसीकरण केंद्रे आता गजबजली आहेत. लसीकरण करताना नागरिकांना भितीने ग्रासल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे डोस घेण्याचे प्रमाण आता वाढले आहे. गेल्या आठ दिवसात दररोज सरासरी दहा हजार नागरिकांनी लस टोचून घेतली असून अद्यापही एक लाख ३० हजार ४११ नागरिक असे आहेत की, त्यांना पहिला डोस घेवून ८४ दिवस उलटले तरी अद्यापही दुसरा डोस घेतलेला नाही.