कोरोना आजार न होण्यासाठी खूप प्रयत्न केले.. खूप काळजी घेतली.. पण त्यात यश न आल्याने आता मी थेट देवाकडे साकडे घालायला चाललो आहे.. अशी चिठ्ठी लिहीत सिन्नर तालुक्यातील शहापूर (दातली) येथील एका 30 वर्षीय तरुणाने आंब्याच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि.21) सकाळी घडली. . गंभीर बाब म्हणजे, तरुणाच्या आजीचा दशक्रिया देवनदीकाठी एकीकडे सुरू असतानाच हा तरुण आपली जीवनयात्रा संपवत होता. लक्ष्मण नामदेव बर्डे असे मृताचे नाव आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दहा दिवसांतील नाशिक जिल्ह्यातील ही तिसरी आत्महत्या आहे.
करोनाच्या प्रादुर्भावाला घाबरून मानसिक विकारांचे प्रमाणही आता वेगाने वाढत असल्याची दुर्दैवी बाब समोर येत आहे. त्यातून निराश होत तरुणांना जगणंच नकोसे झाल्याचे मंगळवारी घडलेल्या घटनेवरून दिसते. लक्ष्मण याच्या आजीचा मंगळवारी दशक्रिया विधी होता. कुटुंबातील मोजक्या सदस्यांच्या उपस्थितीत देवनदीकाठी विधी सकाळी 7 वाजेदरम्यान झाला. यावेळी तो पिंडाला पाणी द्यायला व केस काढायला न आल्याने त्याचा भाऊ सुदाम घराकडे आला असता त्याच्या अंथरुणात लग्नपत्रिकेच्या पाठीमागील कोऱ्या जागेवर मजकूर लिहलेली चिठ्ठी सापडली. कोरोना आजार होऊ नये म्हणून सर्वांनी गरम पाणी प्यावे, मी खूप प्रयत्न केले, काळजी घेतली पण यश आले नाही म्हणून मी आता थेट देवाकडे साकडे घालायला चाललो आहे, रवी तु सर्वांची काळजी घे, पुढच्या जन्मी आपण एकाच आईच्या पोटी जन्म घेऊ, तु माझा मोठा भाऊ हो, असे त्याने चिठ्ठी लिहून ठेवले आहे. ही बाब त्याने लगेच नातेवाईकांना सांगितली. तत्काळ लक्ष्मणचा शोध सुरू केला असता खोपडी शिवारात आंब्याच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.