दुष्काळाच्या सावटाखाली असलेल्या नाशिकमध्ये जोरदार बरसलेल्या पावसाने अवघ्या दोन आठवड्यांतच दुष्काळाचं संकट दूर केलं. गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे पूरस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी नाशिकला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातून कालपासून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे शुक्रवारी (दि.३०) गोदावरीला पूर आला. पाण्याची पातळी दर्शवणारा दुतोंडी मारुती गुडघ्यापर्यंत बुडाला होता. विसर्गामुळे गोदाकाठावरील रामकुंड, गांधी तलाव परिसर पूर्णपणे पाण्याखाली गेला होता.
गेल्या आठवडाभरापासून पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे धरण साठ्यातही वाढ होत असून जिल्ह्यातील पाच धरणांतून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. गंगापूर धरण ८० टक्क्यांपेक्षा अधिक साठा असल्याने गोदावरी नदीत विसर्ग केला जात आहे. नाशिकच्या पुराचे परिमाण म्हणून ओळखल्या जाणार्या दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी लागल्यामुळे नाशिककरांनी लहान पूर अनुभवला. गोदावरीची पाण्याची पातळी वाढल्यानंतर नाशिककरांनी नदीकाठी पूर बघण्यासाठी गर्दी केली होती. विसर्ग कोणत्याही क्षणी वाढण्याची शक्यता असल्यामुळे नदीकाठी सावधानतेचा इशारा दिला आहे.