नवाब मलिक हे केंद्रीय यंत्रणांविरोधात थेट बोलतात आणि स्पष्ट भूमिका मांडतात म्हणून दबाव निर्माण करण्यासाठी ईडीमार्फत मलिकांवर अटकेची कारवाई करण्यात आली. तिन्ही पक्षांवर आणि मंत्र्यांवर दबाव निर्माण करण्याचा हा प्रकार निषेधार्ह असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी दिली. मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा बंगला येथे महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी भुजबळ बोलत होते. लोकशाहीच्या विरोधातील केंद्रीय तपास यंत्रणेच्या वागणुकीविरोधात गुरूवारी सकाळी १० वाजता मंत्रालयाच्या शेजारी महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ महाविकास आघाडीचे मंत्री, आमदार हजर राहून धरणे आंदोलन करणार आहेत. या संपूर्ण कृतीचा निषेध करण्यासाठी जमणार असल्याचे भुजबळ यांनी सांगितले. तर परवापासून तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकत्र तालुका, जिल्हा, शहर पातळीवर मोर्चा, धरणे आंदोलन करणार असल्याचे भुजबळ म्हणाले.
नवाब मलिक यांचा राजीनामा देण्याचा प्रश्न नाही, त्यांच्यावर गुन्हा सिद्ध झालेला नाही. नारायण राणेंना अटक झाली, पण त्यांना राजीनामा द्यायला कुणीही सांगितले नाही. त्यामुळे राजीनामा घेण्याचा प्रश्न नाही. जोवर दोषी नाहीत तसेच न्याययंत्रणेसमोर सिद्ध होत नाही तोवर राजीनामा घेण्यात येणार नाही. केंद्राच्या सांगण्यावरून यंत्रणा काम करते आहे. एका विशिष्ट हेतूने काम सुरू असल्याचेही भुजबळ म्हणाले. त्यामुळे राजीनामा घेण्याचे आम्हाला पटत नाही. एकापाठोपाठ एक अशा मंत्र्यांचा राजीनामा घेण्याचा विरोधकांचा हा डाव असल्याचा दावा भुजबळांनी केला आहे.
१९९३ च्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात वर्षानुवर्षे केसेस चालल्या. पण या प्रकरणात कुठेही नवाब मलिकांचे नाव नाही. या निकालाची लाखो पानांची ऑर्डर आली. पण एकेक टार्गेट करून मंत्र्यांचा राजीनामा घेण्याचा हा प्रकार आहे. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचाही राजीनामा अशाच पद्धतीने घेण्यात आला असेही भुजबळ म्हणाले.
महाराष्ट्रातील मंत्री नवाब मलिक यांच्यावर केंद्रीय तपास यंत्रणेने केलेल्या कारवाईमुळे देशातील अनेक बड्या नेत्यांचे शरद पवारांना फोन आले. सगळ्यांनी पवारांना अन्याय सहन करायचा नाही, असेच सांगितले आहे. तसेच एकत्र काही तरी करण्याची गरज आहे असेही सुचवले आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि शरद पवार यांच्यातही टेलिफोनिक संवाद झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.