आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनी असलेल्या बीसीसीच्या दिल्ली आणि मुंबई कार्यालयावर आयकर विभागाने छापेमारी केली आहे. आयटीच्या अधिकाऱ्यांनी कार्यालयावर छापे मारले असून कार्यालयातील अनेक पत्रकारांचे फोन ताब्यात घेण्यात आले आहेत. याशिवाय बीबीसी कार्यालयात येण्याजाण्यास प्रतिबंध करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळं आता यावरून नवं राजकीय वादंग पेटण्याची शक्यता आहे. दरम्यान, अदानीचे पाप झाकण्यासाठी बीबीसी कार्यालयावर धाडी टाकल्याचा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे.
अमोल मिटकरी यांनी ट्वीट करत मोदी सरकारवर टीका केली आहे. देशात अघोषित आणीबाणीला सुरुवात ! अदानीचे पाप झाकण्यासाठी मोदी सरकारकडून बीबीसी कार्यालयावर IT च्या धाडी.. मोदी सरकारकडून राजरोस लोकशाहीचा खुन ! जागरूक नागरिकांनी एकत्र येणे गरजेचे. #जागो भारतवासी, असं ट्वीट अमोल मिटकरी यांनी केलं आहे.
देशात अघोषित आणीबाणीला सुरुवात ! अदानी चे पाप झाकण्यासाठी मोदी सरकारकडून बीबीसी कार्यालयावर IT च्या धाडी..
मोदी सरकारकडून राजरोस लोकशाहीचा खुन ! जागरूक नागरिकांनी एकत्र येणे गरजेचे.#जागो भारतवासी— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) February 14, 2023
काही दिवसांपूर्वी बीसीसीने द इंडिया क्वेशन (The India Question) नावाचा एक माहितीपट प्रसारित केला होता. गुजरातमध्ये सन २००२ ला दंगल उसळली. त्यावेळी पंतप्रधान मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते. दंगल घडली तेव्हा मोदी यांची काय भूमिका होती यावर या डॉक्युमेंटरीमध्ये भाष्य करण्यात आले आहे. सोशल मिडिया व ऑनलाईन वाहिन्यांवर ही डॉक्युमेंटरी प्रसारीत करण्यात आली होती. मात्र, देशाची प्रतिमा मलीन होत असल्याच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारने या माहितीपटावर बंदी आणली. देशातील बहुतांश महाविद्यालये व विद्यापीठांमध्ये ही डॉक्युमेंटरी दाखवण्यात आली. त्यावरुन वादही झाला.
बीसीसीचा माहितीपट वादात असतानाच आयकर विभागाने त्यांच्या कार्यालयावर छापे मारले आहेत. दरम्यान याप्रकरणी विरोधकांनी आता केंद्र सरकारवर टीका करायला सुरुवात केली आहे.