कोरोनाच्या नव्या ऑमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारची तातडीची बैठक आयोजित केली होती. मोदी यांनी आढावा बैठकीमध्ये नव्या व्हेरियंटवर खबरदारीचे उपाय करण्याचे निर्देश दिले आहेत. देशातील दुसऱ्या लसीच्या लसीकरणाचा वेग वाढवण्यात यावा तसेच विदेशातून येणाऱ्या प्रवाशांवर कडक निर्बंध लागू करण्यात यावेत असे निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चाचण्या आणि ट्रिटमेंटवर अधिक भर देण्यास आरोग्य विभागाला सांगितले आहे. जिनोम सिक्वेंसिंग लॅबमध्ये होणाऱ्या चाचण्या अधिक वेगाने करण्यात याव्यात असे निर्देश मोदींनी या बैठकीत दिले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या आढावा बैठकीमध्ये ऑमिक्रॉन व्हायरसवर चिंता व्यक्त केली आहे. तसेच देशात कोरोनाप्रतिबंधक लसींच्या दुसऱ्या डोसची संख्या वाढवण्यात यावी असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. कोरोनाविरोधात लढा देण्यासाठी लसीकरणच प्रभावी असल्यामुळे लसीकरणात वाढ करण्यात येत आहे. ज्या नागरिकांना पहिला डोस देण्यात आला आहे. त्यांना दुसऱ्या लसीचा डोस वेळेवर देण्यात यावा अशा सर्व राज्यांना सूचना करण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे.
विदेशी प्रवाशांवर कडक निर्बंध
जगातील काही देशांमध्ये आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये ऑमिनक्रॉन व्हेरियंटने धुमाकूळ घातला आहे. हा व्हेरियंट घातक असल्यामुळे विदेशातून भारतात येणाऱ्या विमानांवर नियंत्रण ठेवावे लागेल. ऑमिक्रॉन व्हेरियंट आढळलेल्या देशातून येणाऱ्या विमानांवर आणि प्रवाशांवर निर्बंध लादण्याची आवश्यकता असल्याचे मोदींनी बैठकीत सांगितले आहे. तसेच येणाऱ्या प्रवाशांचे लसीकरण झाले आहे की, नाही तसेच त्यांचे आरटीपीसीआर टेस्ट बंधनकारक करावी, प्रवशांचे क्वारंटाईन करण्यासंदर्भात मोदींनी निर्देश दिले आहेत. ज्या देशात व्हेरियंट आढळला आहे त्या देशातून येणाऱ्या प्रवाशांना क्वारंटाईन करण्याबाबतचे निर्देश मोदींनी दिले आहेत. या नियमांमध्ये कुठेही सूट देण्यात येऊ नये असेही मोदींनी स्पष्ट केलं आहे.
औषधे, गोळ्यांच्या साठ्यात वाढ करा
नव्या कोरोना व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर देशातील आणि राज्यांतील आवश्यक गोळ्या आणि औषधांच्या साठ्यात वाढ करण्यात यावी. केंद्राकडून राज्यांच्या मदतीने अत्यावश्यक असलेल्या गोळ्यांचा आणि औषधांचा पर्याप्त साठा सुनिश्चित करण्यात यावा असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. दुसऱ्या लाटेमध्ये ऑक्सिजनची समस्या निर्माण झाली होती. यामुळे सर्व राज्यांनी ऑक्सिजनचा साठा करुन ठेवावा तसेच केंद्राकडून नव्या व्हेरियंटबाबत जनजागृती करण्यासाठी राज्यांची मदत घ्यावी असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैठकीत सांगितले आहे.
हेही वाचा : कितीही संकटे येवोत, सर्वसामान्यांच्या भल्यासाठीचे काम अखंडीत सुरू राहील- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे