कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र संचारबंदी लागू असतांना, महापालिका क्षेत्रातील नागरिकांना आयत्या वेळेस अत्यावश्यक सेवेकरिता वाहतूकीचे साधन उपलब्ध व्हावे म्हणून, महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या निर्देशानूसार उप प्रादेशिक परिवहन अधिकारी (कल्याण) संजय ससाणे यांनी काही रिक्षा ऑन कॉल पध्दतीने उपलब्ध करुन दिलेल्या आहेत.
अत्यावश्यक सेवेसाठी ‘ऑन कॉल रिक्षा’ सेवा सुरू
कल्याण डोंबिवली शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्याने सार्वजनिक व खाजगी वाहनांच्या वाहतुकीस प्रतिबंध घालण्यात आलेला आहे. मात्र अत्यावश्यक सेवेच्या वेळी वाहन उपलब्ध होत नसल्याने नागरिकांचे विशेषत: रूग्णांचे हाल अधिक होत आहेत. या पार्श्वभूमीवर ऑन कॉल रिक्षा सेवा सुरू करण्याचा निर्णय पालिका आयुक्तांनी घेतला आहे. यापूर्वीही उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी काही रिक्षांची सेवा ऑन कॉल पध्दतीने महापालिकेच्या नागरिकांसाठी उपलब्ध करुन दिली होती. सदर रिक्षाची सेवा मिटर नुसार भाडेतत्वावर नागरिकांकरिता उपलब्ध करुन देण्यात येत आहे, त्याचे भाडे नागरिकांनी परस्पर रिक्षा चालकास द्यायचे आहे.
कल्याणमध्ये १३ तर डोंबिवलीत १२ रिक्षा कार्यरत
ऑन कॉल रिक्षा चालकांनी प्रवाशांच्या वाहतूकीची नोंदवहीत नोंद दिनांकानुसार ठेवायची असून ती नोंदवही कडोमपा/आरटीओ/पोलीस यांनी मागितल्यावर त्यांना उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. आपत्कालीन रिक्षा चालकाने रिक्षाच्या पुढे व मागे ‘ऑन कॉल’ असा बोर्ड प्रदर्शित करायचा असून ऑन कॉल पध्दतीने काम करण्याकरीता कल्याण परिसरासाठी १३ तर डोंबिवली परिसरासाठी १२ रिक्षा कार्यरत असणार आहेत.