घरमहाराष्ट्रतर वर्षअखेरीस मोदींना सत्तेतून जावे लागेल - पृथ्वीराज चव्हाण

तर वर्षअखेरीस मोदींना सत्तेतून जावे लागेल – पृथ्वीराज चव्हाण

Subscribe

राफेल प्रकरणात सीबीआय आणि सर्वोच्च न्यायालय ठाम राहिल्यास मोदी सरकारला यावर्षीच्या अखेरीस सत्तेतून पायउतार व्हावे लागेल.

राफेल विमान खरेदी घोटाळा देशाच्या इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा आहे. या प्रकरणात सीबीआय गुन्हा दाखल करण्याच्या प्रयत्नात असताना संबंधित अधिकाऱ्यांची रात्रीतूनच बदली केली. या प्रकरणात सीबीआय आणि न्यायालय ठाम राहिल्यास मोदी डिसेंबरअखेर सत्तेवरून पायउतार होतील, असे मत राज्याचे माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे. जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने विजयनगर (ता. कराड) येथे दोन दिवसांपासून सुरू असणाऱ्या संवाद कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते.

चव्हाण म्हणाले, खोटी आश्‍वासने देऊन सत्तेवर आलेले नरेंद्र मोदी, अमित शहा, भाजप आणि आरएसएस यांचा खरा चेहरा जनतेसमोर आला आहे. मोदींचा ‘वन मॅन शो’ असणारा गुजरात पॅटर्नही लोकांना कळाला. हिच हुकूमशाही देशात राबवण्याचे मोदींचे प्रयत्न आहेत. स्वायत्त संस्था मोडीत काढण्याचा प्रयत्न हा त्याचाच एक भाग आहे. निवडणूक काळात दिलेले एकही आश्‍वासन पूर्ण करू शकले नसल्याने ते आता नवी आश्‍वासने घेवून जनतेसमोर जाऊ शकत नाहीत. त्यामुळे या निवडणुकीच्या तोंडावर राम मंदिराचा मुद्दा पुढे करून जाती-धर्मामध्ये विद्वेश पसरविण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. जातीय दंगली, धार्मिक स्थळे किंवा व्यक्तींवर हल्ले होण्याचेही प्रकार होतील. त्यामुळे जनतेने सावध राहिले पाहिजे, असा इशारा पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला.

- Advertisement -
‘मोदी जगभर फिरतात पण देशातल्या शेतकऱ्यांसाठी वेळ नाही’

महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटना वाढल्या असून भाजपचेच मंत्री, आमदार यामध्ये अडकले आहेत. गोरक्षेच्या नावाखाली माणसांना ठेचून मारले जात आहे, जाती-जातीमध्ये विद्वेश पसरवला जात आहे. या घटनांवर पंतप्रधान मोदी चकार शब्द बोलायला तयार नाहीत. खोटे बोलून, धर्माचे धृवीकरण करून मोदी पुन्हा सत्तेवर आले तर देशात लोकशाही संपुष्टात येईल, राज्यघटना बदलली जाईल आणि हुकूमशाही राजवट लागू होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

यूपीए सरकारच्या काळात फ्रान्स बरोबर ५४० कोटी रूपयांप्रमाणे १२६ लढावू विमाने खरेदी करण्याचा करार करण्यात आला होता. मोदी यांनी तो करार रद्द करून १६७० कोटी रूपयांना ३६ राफेल विमाने खरेदीचा नवा करार केला, तोही कोणालाही विश्‍वासात न घेता. विमानाची किंमत वाढली कशी? याची माहिती ते देत नाहीत. याबाबत सीबीआयकडे तक्रार करण्यात आली. एखादी तक्रार आल्यास सीबीआयला आठ दिवसांत यासंबंधी गुन्हा दाखल करावा लागतो किंवा तक्रार निकाली काढावी लागले. सीबीआय गुन्हा दाखल करण्याच्या तयारीत असतानाच मोदी सरकारने अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली केली. शिवाय या संबंधाचे महत्वाचे दस्ताऐवजही सील केले आहेत. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले आहे. सीबीआयचे अधिकारी आणि सर्वोच्च न्यायालय ठाम राहिल्यास मोदी राफेल प्रकरणात पायउतार होतील, असे मत चव्हाण यांनी व्यक्त केले.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -