नव्या शैक्षणिक धोरणावर बोट ठेवत प्रकाश आंबेडकरांची मोठी घोषणा, शिक्षक-पदवीधर निवडणूक…

Prakash Ambedkar on New Education Policy | कोकण पदवीधर मतदारसंघ वगळता दोन शिक्षक मतदारसंघ आणि दोन पदवीधर मतदारसंघ लढवण्यात येणार असल्याचं आंबेडकरांनी आज जाहीर केलं. पत्रकार परिषद घेत आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

prakash ambedkar
prakash ambedkar

मुंबई – केंद्र सरकारकडून पुढच्या वर्षांपासून नवे शैक्षणिक धोरण राबवण्यात येणार आहे. मात्र, हे धोरण राबवण्याआधी संस्था आणि शिक्षकांचेच प्रशिक्षण झालेले नाही. त्यामुळे पुढील पाच वर्षांत पिढीचं नुकसान होईल, असं वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. त्यामुळे याच मुद्द्यावरून वंचित शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढवणार असल्याचं आंबेडकरांनी आज घोषित केलं. कोकण पदवीधर मतदारसंघ वगळता दोन शिक्षक मतदारसंघ आणि दोन पदवीधर मतदारसंघ लढवण्यात येणार असल्याचं आंबेडकरांनी आज जाहीर केलं. पत्रकार परिषद घेत आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

हेही वाचा – वंचितचे नेते प्रकाश आंबेडकरांनी केला युतीसंदर्भात खुलासा

पूर्वी ११ अधिक ४ असं शैक्षणिक धोरण होतं. नंतर ते १०-२-३ असं पॅटर्न करण्यात आलं. यामुळे पाच वर्ष पिढी निकामी झाली. धोरण शिक्षक समजून घेण्याच्या आतच नवं धोरण लादलं जातं. यामुळे विद्यार्थ्यांचा जो शैक्षणिक विकास व्हायला हवा तो होत नसल्याचाही दावा प्रकाश आंबेडकरांनी केला. आताही अचानक नवे शैक्षणिक धोरण पुढच्या वर्षांपासून लागू करण्यात येणार आहे. या नव्या शैक्षणिक धोरणानुसार पुन्हा ११ अधिक ४ अशी व्यवस्था आणण्याची चर्चा सुरू आहे. मात्र, शैक्षणिक धोरण बदलत असताना शिक्षकांचंही प्रशिक्षण झालं पाहिजे. पण तसं काहीही झालं नाही. त्यामुळे पुन्हा पुढच्या पाच वर्षांत एक पिढी संपणार, असं भाकित आंबेडकरांनी केलं आहे. आताचे हे बदल कौशल्य आणि आयटी संदर्भातील आहेत. हे बदल शिक्षकांनाच समजले नाही तर विद्यार्थ्यांना काय समजणार? म्हणूनच आम्ही या मुद्द्यावरून शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ निवडणूक लढवणार आहोत, असं आंबेडकरांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा – वंचितचे प्रकाश आंबेडकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मध्यरात्री भेट; युती होणार का?

दरम्यान, वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना यांची युती होण्याची चर्चा आहे. युतीबाबत आम्ही दोन्ही पक्ष एकमेकांवर लाईन मारतोय अशी मिश्किल टिप्पणी प्रकाश आंबेडकरांनी काल केली होती. तसंच, आजही त्यांनी या युतीबाबत भाष्य केलं आहे. आमच्यात चर्चा झाली असून युतीबाबतची पुढची घोषणा उद्धव ठाकरेच करतील, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची उद्या जयंती आहे. त्यानिमित्ताने षण्मुखानंद सभागृहात उद्धव ठाकरेंची सभा होणार आहे. यावेळी ते वंचितसोबतची युती जाहीर करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.