महाराष्ट्रातून तीन मोठे प्रकल्प राज्याबाहेर गेल्यानंतर राजकीय वर्तुळात सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. परंतु राज्यातून एकानंतर एक प्रकल्प दुसऱ्या राज्यात जात असल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अडचणीत वाढ होणार, असं वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, राज्यातून एकानंतर एक प्रकल्प बाहेर जात असल्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अडचणीत वाढ होणार नाही. कारण ते मोदींच्या पक्षातले आहेत. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना तोंड द्यावं लागणार आहे. ज्या ठिकाणी ते जातील तिथे त्यांना याचं उत्तर द्यावं लागणार आहे, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
पहिला प्रकल्प गेला तेव्हा आम्ही जबाबदार नव्हतो, असे ते म्हणाले. त्यानंतर सरकारच्या हातून दोन प्रकल्प गेले आहेत. परंतु आता तिसराही पेट्रो केमिकल्सचा प्रकल्प कर्नाटकात जाण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे असे प्रकल्प बाहेर जाताना, एकनाथ शिंदे अडचणीत आहेत असे मी मानतो, असं आंबेडकर म्हणाले.
नरेंद्र मोदी केवळ गुजरातचे पंतप्रधान आहे, असं वाटतं. ते सगळे प्रकल्प गुजरातला घेऊन जात आहेत. नरेंद्र मोदींनी आतापर्यंत एकही पत्रकार परिषद घेतलेली नाही. मोदी यांनी एखादं स्टेटमेंट वाचण्यापलीकडे पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरं दिली पाहिजेत, अशी अपेक्षा आहे, असंही आंबेडकर म्हणाले.