कोकण रेल्वे आता पूर्णपणे विजेवर धावण्यासाठी सज्ज झाली आहे. कोकण रेल्वेचे विद्युतीकरण पूर्ण झाले असून, या मार्गाची रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून चाचणीही पूर्ण झाली आहे. कोकण रेल्वेच्या विद्युतीकरणाचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी ट्विटरच्या माध्यमातून १०० टक्के विद्युतीकरणापर्यंत पोहोचल्याबद्दल कोकण रेल्वेचे कौतुक केले आणि शाश्वत विकासातील एक नवीन मैलाचा दगड असल्याचं सांगितलं.
Congratulations to the entire @KonkanRailway Team for the remarkable success of ‘Mission 100% Electrification’ and setting new benchmarks of sustainable development. https://t.co/NB0DAZIVNz
— Narendra Modi (@narendramodi) March 30, 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह माजी मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी कौतुक केलं आहे. ”खरंच खूप मोठी उपलब्धी! अभिनंदन कोकण रेल्वे, या ‘मिशन 100% विद्युतीकरणा’साठी टीम!” असं टविट करत देवेद्र फडणवीस यांनी कोकण रेल्वेचे कौतुक केलं. लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते या प्रकल्पाचे अधिकृतपणे लोकार्पण होणार आहे.
Indeed a great achievement!
Congratulations @KonkanRailway team for this ‘Mission 100% Electrification’ ! #Konkan @AshwiniVaishnaw https://t.co/Ws2It1Jh36— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) March 30, 2022
कोकण रेल्वे आता पूर्णपणे विजेवर धावण्यासाठी सज्ज झाली आहे. विजेवर प्रवासी रेल्वे गाड्या सुरू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात डिझेलची बचत होणार आहे. तसेच प्रवाशांना प्रदूषणमुक्त वातावरणात रेल्वे प्रवास करणे शक्य होणार आहे. दरम्यान, १२ डब्यांच्या रेल्वेगाडीच्या एका किलोमीटरसाठी साधारणपणे ६ ते १० लिटर डिझेलची आवश्यकता असते. इंजिनच्या अश्वशक्तीनुसार यात बदल होतो.
सुरक्षा आयुक्तांकडून २२ आणि २४ मार्च रोजी तपासणी पूर्ण झाली. मात्र यासंदर्भातील रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या अहवालाची कोकण रेल्वेला प्रतीक्षा होती. अखेर हा अहवाल प्राप्त झाला असून, कोकण रेल्वे मार्गावर विजेवर धावणाऱ्या रेल्वे गाड्या सुरू करण्यात येणार आहे.
कोकण रेल्वेच्या विद्युतीकरणाला २०१६ रोजी रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली होती. रत्नागिरी ते थिविम यादरम्यान विद्युतीकरण पूर्ण झाल्यानं कोकण रेल्वेच्या अखत्यारीत येणाऱ्या ९७० किमी लांबीच्या रुळांवर विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. या विद्युतीकरणासाठी एकूण १२८७ कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. कोकण रेल्वेच्या रत्नागिरी ते वेर्णा या मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले. त्याची तपासणी करण्यासाठी रेल्वेचे सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा यांच्या नेतृत्वाखाली पथकाने बुधवारी रत्नागिरी ते नांदगावपर्यंत तपासणी केली होती.
संपूर्ण कोकण रेल्वे मार्गाची सीआरएस ६ टप्प्यांमध्ये यशस्वीरित्या करण्यात आली आहे. ही तपासणी मार्च २०२० पासून सुरू होती. रत्नागिरी आणि थिविम स्थानकादरम्यानच्या शेवटच्या विभागाची सीआरएस तपासणी २४ मार्च २०२२ रोजी करण्यात आली आणि त्याला २८ मार्च २०२२ रोजी अधिकृतता प्राप्तता मिळाली आहे.
हेही वाचा – “शिवसेना, मुंबई पालिका आयुक्तांना खुलं आव्हान…”; ‘गाई’च्या घटनेवरून आशिष शेलारांची टीका