पुण्यातील आंबिल ओढ्याचा वाद पेटला आहे. आज सकाळी अचानक कोणतीही नोटीस न बजावता आंबिल ओढा परिसरातील अतिक्रमण हटवण्यासाठी पोलिसांचा फौजफाटा पोहोचला. त्यावेळी स्थानिक नागरिक आणि पोलिसांमध्ये तुफान राडा झाला. एवढंच नाही तर काही नागरिकांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. स्थानिकांच्या मते, आंबिल ओढ्याचा नैसर्गिक प्रवाह बदलण्याचा घाट बिल्डरच्या फायद्यासाठी केला जात आहे. तसेच हा आमच्यावर न्याय आहे. यादरम्यान एका चिमुरड्याने माध्यमांशी संवाद साधताना आपला आक्रोश व्यक्त केला आहे. यावेळी या स्थानिक मुलाचे अश्रू अनावर झाले आणि बोलता बोलता तो ढसाढसा रडू लागला. त्याने प्रशासनाला आता आम्ही कुठे जायचे? असा आर्त सवाल केला.
काय म्हणाला चिमुरडा?
‘आमची घर तोडत आहेत आणि पोलीस चौकीत आमच्या माणसांना मारत आहेत. मग आम्ही कुठे जायचे? ज्यावेळेस कारवाईला सुरुवात झाली तेव्हा आमच्या फडके काकांचा बीपी वाढला आणि ते चक्कर येऊन पडले. आता त्यांना ससून हॉस्पिटलमध्ये दाखल केलंय. आमच्या इथली काही लोकं दत्तनगरला गेलेत, तर काही चंदननगरला. माझे सगळे मित्र इथून गेले आहेत. आता कुणीच इथे नाही आहे. खाली जाऊ पाहिले तर सगळी घरे तोडली आहेत. आता आम्ही जायचे कुठे?’, असे चिमुरडा रडत रडत माध्यमांना सांगत होता.
माहितीनुसार, आता या कारवाईला साधारणतः ४ ते ५ तास पूर्ण होण्यासाठी लागतील. कारण १३४ घरांवरती कारवाई करायची आहे. इथल्या नागरिकांचे राजेंद्र नगरमधील स्कीममध्ये स्थलांतर करण्यात आले आहे. काही लोकांना ८व्या आणि ९व्या मजल्यावर घरे देण्यात आली आहेत. दरम्यान विरोध यासाठी केला जातोय की, नागरिकांना कुठलीही हमी दिली नाही आहे. किती दिवसांत कायमी स्वरुपी पुनर्वसन केले जाणार, याबाबत लेखी माहिती दिली नाही आहे. असे असताना भर पावसाळ्यात आणि कोरोनाच्या परिस्थितीत बेघर केले जात आहे. त्यामुळे स्थानिक नागरिक आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे.