पुण्यातील आंबिल ओढ्याचा प्रश्न चिघळला आहे. आता आंबिल ओढा परिसरातल्या रहिवाशाच्या घरांवर बुलडोझर चालवण्यास सुरुवात झाली आहे. केदार असोसिएट्स बिल्डरच्या नोटिशीनंतर ही कारवाई केली जात असल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे. तर दुसऱ्या बाजूला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एसआरए आणि महापालिकेच्या आदेशानंतर कारवाई केली जात असून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यादरम्यान स्थानिकांनी याला तीव्र विरोध करत काहींनी नागरिकांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.
आंबिल ओढ्याचा नैसर्गिक प्रवाह बदलण्याचा घाट बिल्डरच्या फायद्यासाठी केला जात आहे, असा आरोप स्थानिकांनी केला आहे. त्यामुळेच आंबिल ओढा परिसरातील घरांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. माहितीनुसार, आज सकाळी अचानक आंबिल ओढा परिसरातील अतिक्रमण हटवण्यासाठी ७०० ते ८०० पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. पण याचदरम्यान पोलिस आणि स्थानिकांमध्ये झटापट झाली असून काही नागरिकांनी अंगावर रॉकेल ओतून स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एसआरए आणि महापालिका नोटीस दिली असून त्यानुसार शांतपणे कारवाई केली जात आहे. शांतात भंग होऊ नये म्हणून पोलीस तैनात करण्यात आले आहे.
याबाबत भाजप आमदार आणि माजी महापौर मुक्ता टिळक म्हणाल्या की, ‘बैठकीत पावसाळ्यात अशाप्रकारची कारवाई करायची नाही, असं ठरलं होत. त्यामुळे आता ही कारवाई का केली आहे? असा सवाल प्रशासनाला केला आहे. मात्र त्यांच्याकडे या प्रश्नाचे उत्तर नाही आहे. यामागचं नेमकं कारण शोधाव लागेल. दरम्यान जर सत्ताधारी भाजपने पावसाळ्यात कारवाई करू नये असं ठरवलं होते, तर ही कारवाी कशी झाली? त्यामुळे आता याप्रकरणी राज्य सरकारसोबत चर्चा करून प्रशासनावर कारवाई करण्याबाबत विचारणा करू.’