मागील २४ तासांपासून कोकणात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. कोकणाला अतिवृष्टीचा तडाखा बसलाय. या विभागात सर्वाधिक पाऊस झाला असून रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक नद्या आणि नाल्यांना पूर आला आहे. या पुरामुळे आणि अतिवृष्टीमुळे २१ गावांचा संपर्क तुटला आहे. गेल्या १२ तासांपासून रत्नागिरी-सातारा मार्ग बंद ठेवलेला होता. दरड कोसळल्यानंतर कोणतीही जिवीतहानी किंवा वित्तहानी झालेली नाही.
खेड तालुक्यात येणाऱ्या रघुवीर घाटात मागील १५ दिवसांपासून दरड कोसळण्याची तिसरी घटना आहे. प्रशासनाकडून दरड हटवण्याचं काम सुरू आहे. तसेच दोन जिल्ह्यांना जोडणारा रस्ता पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. २४ तासांत मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील काजळी नदीला पूर आला असून राजापूर, लांजा आणि संगमेश्वरमध्येही मुसळधार पाऊस झाल्याची माहिती आहे.
साताऱ्यातील महाबळेश्वर तालुक्यातील काही गावांना प्रशासकीय कामांसाठी महाबळेश्वराला जाणं परवडत नाही. त्यामुळे अनेक गावांचं दळणवळण व्यवस्थाही रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमधून चालत असते. परंतु आता रघुवीर घाटात दरड कोसळल्यानं सातारा जिल्ह्यातील २१ गावांची मोठी गैरसोय झाली आहे.
राज्याच्या अनेक भागांतील नदी नाल्यांना पूर आल्याने जनजीव विस्कळीत झाले आहे. तसेच, कोकण परिसरातही पावसाने हजेरी लावली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातही कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. सध्यस्थितीत राज्याच्या विविध भागात चांगला पाऊस नोंदवला जात आहे. विशेषत: मराठवाड्यातील औरंगाबाद, लातूर, नांदेड यासह कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी याठिकाणी पाऊस पडत आहे. यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील पारवा आणि साखरा या सर्कलमध्ये अतिवृष्टीसदृश पावसाची नोंद झाली आहे.
हेही वाचा : राज्यातील ‘या’ भागांत पुढील 4 दिवस अतिवृष्टीचा इशारा