मुंबईः माझ्या ताफ्याला कोण तरी अडवणार आहे हे इंटेलिजन्सला कळलं, पण पवार साहेबांच्या घरी एसटीचे लोक जाणार आहेत हे इंटेलिजन्सला कळलं नाही, असं म्हणत राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकार आणि गृहमंत्र्यांवर हल्लाबोल केलाय. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची उत्तर सभा ठाण्यात झाली, त्यावेळी ते बोलत होते.
भाषण करताना कदाचित माझा आज टेबल फॅन होणार आहे. आता व्यासपीठाजवळ येत असताना अग्निशामक दलाचा बंब दिसला, इतकी काय आग लावणार नाही. आज दुपारी बसलो असताना एक पोलीस अधिकाऱ्याचा फोन आला. त्याने सांगितलं की, आपण किती वाजता निघणार आहात. काही संघटना तुमचा ताफा अडवण्याचा प्रयत्न करणार आहे, मी म्हटलं माझा. आम्ही सगळे त्यांना ताब्यात घेऊ, फक्त निघायची वेळ समजली तर बरं होईल, असं ते म्हणाले. माझ्या ताफ्याला कोण तरी अडवणार आहे हे इंटेलिजन्सला कळलं, पण पवार साहेबांच्या घरी एसटीचे लोक जाणार आहेत हे इंटेलिजन्सला नाही कळलं, असंही राज ठाकरेंनी अधोरेखित केलंय.
खरं तर त्यांना प्रत्येक गोष्ट माहीत असते, एखादा माणूस शिंकला तर तो कोरोनाचा शिंकला की साधा शिंकला हेही त्यांना माहीत असते. गुढीपाडव्याची सभा झाल्यानंतर अनेकांनी जे आपापले तारे तोडले, अनेक राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांनी जे तारे तोडले ते तोडल्यानंतर असं वाटलं की याचं उत्तर द्यावं लागेल. पत्रकार परिषद घेऊन उत्तर द्यायचं नव्हतं, पत्रकार नको ते प्रश्न विचारतात आणी विषय भरकटवतात, असंही राज ठाकरेंनी सांगितलंय.
आताही महाराष्ट्रात सभा काही ठिकाणी वीज नाही म्हणून दाखवत नाही आहेत. पण सभा मोबाईलवर पाहता येऊ शकते. पण ही लाईव्ह सभा मोठी स्क्रीन लावून जम्मूमध्येही दाखवली जातेय. अनेक राज्यांमध्ये ही सभा दाखवली जातेय, असंही राज ठाकरे म्हणालेत.