शरद पवार हे बिनचिपळ्यांचे नारद असून संजय राऊत हे मातोश्रीचे कर्मचारी आणि सिल्वर ओकचे रखवालदार असल्याचा सणसणीत टोला मनसेचे नेते प्रकाश महाजन यांना लगावला. ठाण्यात आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची उत्तरसभा होत असून या सभेत मनसेचे नेते संदीप देशपांडे, नाशिक मनसेचे नेते सलीम शेख यांनी सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींचा दाखला देत मविआ सरकारला लक्ष्य केले. यावेळी महाजन यांनी थेट शरद पवार आणि संजय राऊत यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , आदित्य ठाकरे यांच्यावरही टिकेचे आसूड ओढले.
यावेळी महाजन यांनी महाविकास आघाडीच्या बांधणीपासून ते सद्यपरिस्थितीवर भाष्य केले. तसेच त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही खरमरीत टीका केली. तसेच अडीच वर्षापूर्वी जे गलिच्छ राजकारण महाराष्ट्रात झाल्याचेही ते म्हणाले. त्यासाठी दोन गुन्हेगार कारणीभूत आहेत. त्यातील एक स्वत:ला विश्वप्रवक्ता समजणारा आणि मातोश्रीची नोकरी करणारा आणि रखवाली सिल्वर ओकची करतो. तर दुसरा आहे महाराष्ट्रातल्या राजकारणात बिनाचिपळ्याचे नारद असलेले शरद पवार आहेत. असे सांगत महाजन यांनी खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीकेचे आसूड ओढले. तसेच महाजन यांनी मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे बाळासाहेबांनाही विसरले आणि नारदाच्या जाळ्यात फसले असेही म्हटले. तसेच याजागी जर राज ठाकरे असते तर त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीला लाथ मारली असती. असाही टोला महाजन यांनी लगावला. यावेळी त्यांनी आदित्य ठाकरेंवरही टीका केली. आदित्य यांना राज यांच्याकडून शिकण्याचे आवाहन केले. तसेच स्थायी समिती अध्यक्ष य़शवंत जाधव यांच्यावरही त्यांनी टीका केली. तसेच मविआ सरकारमधील भ्रष्टाचारावरही त्यांनी भाष्य केले.
त्याचबरोबर समान नागरिक कायदा लागू करण्याची मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी नुकत्याच केलेल्या नवहिंदूच्या उल्लेखाचाही यावेळी महाजन यांनी समाचार घेतला. त्याचबरोबर मुख्यमंत्री यांचा मेव्हणा श्रीधर पाटणकर आणि संजय राऊत यांच्यामुळे तुमचं काही खरं नाही अशीही टीका महाजन यांनी यावेळी केली.