सध्या महाराष्ट्रात पाचवीपासून पुढे चाचणी सुरू आहे. तसेच शहरी आणि ग्रामीण भागात १ ली ते ४ थी साठी शाळा सुरू करण्यासाठी शाळा प्रशासनाकडून सध्या होमवर्क सुरू आहे. शाळा सुरू करण्याबाबत टास्कफोर्सचा हिरवा कंदील मिळाला आहे. तसेच शालेय शिक्षण मंत्री आणि आरोग्य विभागाकडून संमती मिळाली आहे. त्यामुळे येणाऱ्या कॅबिनेटमध्ये शाळा सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबाबतचा निर्णय घेतील, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. त्यामुळे राज्यात प्राथमिक वर्गाच्या शाळा सुरू होणार असल्याचे संकेतच राजेश टोपे यांनी दिले आहेत.
शाळा सुरू करण्याबाबत शाळा व्यवस्थापनाला तयारी करण्यासाठीच्या चर्चा पूर्ण झाल्या आहेत. तसेच पालकांचेही काऊंसिलिंग करण्याची तयारी आहे. त्यामुळे येत्या दिवसांमध्ये शाळा सुरू होण्यासाठी शक्य होईल. पण मुख्यमंत्र्यांच्या निर्णयानंतरच शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय होईल. राज्यात कोरोनाची परिस्थिती आता सामान्य होत आहे. पण त्याचवेळी कोरोनाशी संबंधित नियमांची अंमलबजावणी करणेही गरजेचे असल्याचे टोपे म्हणाले. कोरोनाच्या नियमांच्या पालनाच्या बाबतीत गाफील राहून चालणार नाही. त्यामुळेच महाराष्ट्र सरकारही याबाबत अलर्ट असल्याचे टोपे म्हणाले.
राज्यात नाट्यगृह, सिनेमागृहांना ५० टक्के परवानगीने सुरू टेवण्याचे निर्देश दिल आहेत. सध्या कोरोना रूग्णांची आकडेवारी पाहता अशीच स्थिती राहिली तसेच येत्या दिवसात आणखी सुधारणा झाली की हे नियमही शिथिल करण्यात येतील असे राजेश टोपे म्हणाले. पण निर्बंध शिथील करण्याबाबतचा निर्णय हा मुख्यमंत्र्याचाच असेल असेही टोपेंनी स्पष्ट केले. मोठ्या स्टेडियमच्या ठिकाणी मोठी गर्दी व्हावी तसेच सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडावा अशी स्थिती अपेक्षित नाही. त्याठिकाणी कोरोनाबाबतची नियमावली ही अपेक्षितच आहे. पण त्याचवेळी इतर देशांमध्ये ज्या पद्धतीने कोरोनाचा फैलाव होतेय त्या अनुषंगाने आपल्याकडेही कोरोनासाठीचे निर्बंध पाळावेच लागतील असेही राजेश टोपे म्हणाले.