महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोयना धरणातून आज ११ हजार ६६७ कयुसेक पाणी विसर्ग नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे. कोयना पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाल्यानं धराणातील पाण्याची पातळी वाढली असल्याचे सांगितले जात आहे. सकाळी १० वाजता हा पाण्याचा विसर्ग वाढवून ५० हजार क्युसेक्स (५ फुट) इतका करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. कोयना धरणातील पाणीसाठा नियमनासाठी धरणाच्या पायथा वीजगृहातून ११ हजार ६६७ कयुसेक पाणी विसर्ग कोयना नदीपात्रात सुरु करण्यात आल्याने जिल्हा प्रशासनाने कोयना नदी काठांच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून सातारा जिल्ह्यात रात्रीपासून जोरदार पाऊस होत आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात उच्चांकी पावसाची नोंद झाली आहे. भारतीय हवामान विभागानं सातारा जिल्ह्याला रेड अॅलर्ट दिला असून कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे.
#सातारा #कोयना धरणामधून आज दि. 23 जुलै 2021 रोजी सकाळी 8 वाजता एकूण 11667 क्युसेक्स विसर्ग नदीपात्रात सोडणेत आला..
*सकाळी 10 वाजता विसर्ग वाढवून 50000 क्युसेक्स (5 फुट) इतका करणेत येणार.. pic.twitter.com/EQfkcRHBlp— DISTRICT INFORMATION OFFICE, SATARA (@Info_Satara) July 23, 2021
कृष्णा, पंचगंगेने ओलांडली धोक्याची पातळी
दरम्यान, कोल्हापुरातील पंचगंगा नदीने गुरूवारी रात्री धोक्याची पातळी ओलांडल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. पंचगंगा नदी काठच्या गावातील नागरिकांचे वाढत्या पावसामुळ स्थलांतरणाचे काम सुरू करण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पंचगंगा नदीची पाणी पातळी ४६ फूट एक इंचांवर आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ११० हून अधिक बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पंचगंगा नदीची इशारा पातळी ३९, तर धोका पातळी ४३ फूट असून दोन दिवसांपासून जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीची पाणीपातळी वेगाने वाढत आहे.
कोल्हापूर जिल्ह्याला आज ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. कोल्हापुरात पावसाचा जोर कायम असाच राहिल्यास पुन्हा एकदा परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर दुसरीकडे सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीच्या पाणी पातळीतही अचानकपणे वाढ झाली आहे. गुरुवारी रात्री ११ वाजता पाणीपातळी ३० फुटांवर गेल्याचे दिसत आहे. कृष्णा नदीची पाणी पातळी इशारा पातळीजवळ पोहोचली असून सध्या आयर्विन पुलावर पाणी पातळी ३८ फुटांच्यावर गेली असून कृष्णेची ४० फूट इशारा पातळी तर ४५ फूट धोका पातळी असल्याचे सांगितले जात आहे.