गेल्या काही दिवसांपासून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरून पेटलेला मुद्दा शांत होतोच न होतो, ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सावरकर यांच्यासंबंधी महत्त्वपूर्ण घोषणा केलेली आहे. २८ मे हा स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जन्मदिवस असून आता हा दिवस “स्वातंत्र्यवीर गौरव दिन” म्हणून साजरा करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी ट्वीट करून याबाबतची माहिती दिली. काँग्रसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी सावरकर यांच्या बाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर या विरोधात राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारकडून “सावरकर गौरव यात्रा” काढण्यात आली होती. मागील आठवड्यात ६ एप्रिल या दिवशी या यात्रेची सांगता झाली. पण सावरकरांच्या मुद्द्यावरून सुरू असलेला वाद अद्यापतरी शांत झालेला नसलयाचेच दिसून येत आहे.
दरम्यान, राहुल गांधी यांनी “मी माफी मागणार नाही.. मी सावरकर नाही, मी गांधी आहे.” असे वक्तव्य केले होते. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वक्तव्याच्या निषेधार्थ राज्यभरात सावरकर गौरव यात्रा काढली. शिंदे-फडणवीस सरकारने काढलेली “सावरकर गौरव यात्रा” ही यशस्वी झाली असल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर आता राज्य सरकारने घेतलेला हा निर्णय अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे बोलले जात आहे. तर २८ मे हा स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जन्मदिवस “वीर स्मरण दिन” म्हणून साजरा करण्यात यावा, अशा आशयाचे पत्र १ एप्रिलला राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी मुख्यमंत्री कार्यालयाला पाठवले होते. याबाबतचा सकारात्मक निर्णय घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री कार्यालयाकडून याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे.
देशाच्या स्वातंत्र्यासाठी, राष्ट्रउन्नतीसाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे मोठे योगदान आहे. त्यांची देशभक्ती,धैर्य,प्रगतीशील विचारांना पुढे नेण्यासाठी, त्यामाध्यमातून त्यांना अभिवादन करण्यासाठी ‘स्वातंत्र्यवीर गौरव दिन’ साजरा करण्याची मागणी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली होती.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 11, 2023
तसेच, देशाच्या स्वातंत्र्यासाठी, राष्ट्रउन्नतीसाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे मोठे योगदान आहे. त्यांची देशभक्ती,धैर्य,प्रगतीशील विचारांना पुढे नेण्यासाठी, त्यामाध्यमातून त्यांना अभिवादन करण्यासाठी ‘स्वातंत्र्यवीर गौरव दिन’ साजरा करण्याची मागणी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली होती, अशी माहिती देखील मुख्यमंत्र्यांच्या ट्वीटर अकाउंटवरून देण्यात आलेली आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा २८ मे हा जन्मदिवस राज्य शासनामार्फत 'स्वातंत्र्यवीर गौरव दिन’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे,अशी घोषणा मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी केली. यादिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांच्या प्रचार-प्रसारासाठी विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 11, 2023
सावरकरांना ‘भारतरत्न’ कधी?
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत गौरवोद्गार काढले जात आहेत, त्यांच्या विरोधात वक्तव्ये करणाऱ्यांच्या विरोधात मोर्चे काढले जात आहेत. मग सावरकरांना भारतरत्न कधी देण्यात येणार? अशी विचारणा वारंवार विरोधकांकडून केली जात आहे. या प्रश्नाला उत्तर देताना भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी महत्त्वाचे भाष्य केले आहे. प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते, त्या वेळेनुसार सावरकर यांना देखील भारतरत्न देण्यात येईल. सावरकर यांच्यासह आणखी काही क्रांतीकारकांची नावे ही भारतरत्नासाठी देण्यात येणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांच्याकडून सांगण्यात आले आहे.
हेही वाचा – Weather Update : शेतकऱ्यांच्या डोक्यावर अवकाळी पावसाचे, गारपीटीचे संकट कायम