“संजय राऊत माझा जुना मित्र आहे. म्हणूनच मी त्याला अरेतुरे करू शकतो. त्याचा मला अभिमान आहे. पण त्याचा गुन्हा काय आहे? तो पत्रकार आहे, शिवसैनिक आहे, निर्भीड आहे. मग त्याचा गुन्हा काय?” असा रोखठोक सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारला विचारला आहे. संजय राऊतांच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी भाजपवर निशाणा साधला.
“संजय राऊतचं एक वाक्य आहे की मरण आलं तरी चालेल पण मी शरण जाणार नाही,” असं उद्धव ठाकरे म्हणाले. ते पुढे म्हणाले की, “सत्तेचा फेस त्यांच्याकडे आहे. त्यामुळे हे भाजपमध्ये गेलेले सध्या टीका करू शकतात. सत्तेचा फेस उतरला की जे काही सत्य आहे ते जनतेसमोर येईल.”
हेही वाचा – भाजपकडून घृणास्पद राजकारण सुरू, पण नियतीचा खेळ…, उद्धव ठाकरेंचा इशारा
भाजपवर निशाणा
“विरोधात जो बोलेल त्याला वाट्टेल त्या पद्धतीने अडकवायचंच अशी धारणा आहे. पण न्याय देवतेवर आमचा विश्वास आहे. लोकशाहीचे चार स्तंभ आहेत, पत्रकारिता हे चारपैकी एक आहे. तुमच्यापैकीच एकाची आज अटक झाली आहे. नितीन गडकरी म्हणाले तसे राजकारण सोडण्याचा मुद्दा नाही. पण राजकारण घृणास्पद झालं आहे. सध्याच्या राजकारणाची घृणा यायला लागली आहे. मीही अडीच वर्षांच्या काळात मुख्यमंत्री होतो, पण पदाची हवा डोक्यात जाऊ दिली नाही. बाळासाहेब सांगायचे की सत्ता येते आणि जाते पण लोकांशी नम्र राहा. मी लोकांशी नम्र राहण्याचा प्रयत्न केला. निर्गुणपणाने वागू नका, दिवस आणि काळ सर्वांसाठी चांगलाच असतो असं नाही. बदललेल्या काळात यापेक्षा वाईट निर्गुण काळ येईल, असा इशाराही उद्धव ठाकरेंनी भाजपला दिला.