शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं आज पुण्यात निधन झाले, वयाच्या १०० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास घेतला. रविवारी त्यांना न्यूमोनियाचे निदान झाले. त्यामुळे पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. बाबासाहेब पुरंदरेंच्या निधनामुळे राज्यसह देशभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. आज सकाळी १०.३० वाजता वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
७ दशके इतिहास संशोधक म्हणून केले काम
बाबासाहेब पुरंदरे यांचे मूळ नाव बळवंत मोरोपंत पुरंदरे असे होते. त्यांच्या जन्म पुण्याजवळच्या सासवडमध्ये २९ जुलै १९२२ रोजी झाला. त्यांच्यांवरील प्रेम आणि आदरापोटी त्यांना बाबासाहेब या नावाने नवी ओळख मिळाली. पुण्यातील पुणे विद्यापीठाच्या ’मराठा इतिहासाची शकावली- सन १७४० ते १७६४ ’ या भारत इतिहास संशोधक मंडळात त्यांनी गेली सात दशके इतिहास संशोधक म्हणून काम केले.
२०१५ सालापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास बारा हजाराहून अधिक व्याख्यानाच्या माध्यमातून जगभर सांगितला. बाबासाहेब पुरंदरे महाराष्ट्रातील गडकिल्ले, मराठा साम्राज्य आणि शिवकालीन ऐतिहासिक दस्तऐवजांचा सखोल अभ्यास म्हणून ओळखले जात हेते. बाबासाहेब पुरंदरे यांनी विषेशत: ऐतिहासिक विषयांवर वर्णनात्मक लेखन, ललित कादंबरी लेखन तसेच नाट्यलेखन व ‘जाणता राजा’ या नाटकाचे दिग्दर्शन केले. यादरम्यान त्यांना महाराष्ट्र सरकारने २०१५ साली राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार महाराष्ट्र भूषण देऊन गौरव केला. इतिहास संशोधन केलेल्या कार्याची दखल घेत त्यांना ‘पद्मविभूषण’ पुरस्कारनेही गौरवण्यात आले.
‘जाणता राजा’ नाटकाचे यश
‘जाणता राजा’ हे त्यांच्या आयुष्यातील सर्वात गाजलेले नाटक होते. बाबासाहेब पुरंदरे यांच्या ‘जाणता राजा’ या महानाट्याचे गेल्या २७ वर्षांत १२५० हून अधिक असे विक्रमी प्रयोग झाले आहेत. विशेष म्हणजे हे नाटक हिंदी-इंग्रजीसह ५ अन्य भाषांत भाषांतरित करण्यात आले आहे या नाटकामध्ये जवळपास १५० कलावंतांची मोठी फौज काम करते. बाबासाहेब पुरंदरे यांनी नाटकाशिवाय ललित कादंबरी लेखन केले. ‘सावित्री’, ‘जाळत्या ठिणग्या’, ‘मुजऱ्याचे मानकरी’, ‘राजा शिवछत्रपती’, ‘महाराज’, ‘शेलारखिंड’, ‘पुरंदऱ्यांचा सरकारवाडा’, ‘शनवारवाड्यातील शमादान’, ‘शिलंगणाचं सोनं’, ‘पुरंदरच्या बुरुजावरून’, ‘कलावंतिणीचा सज्जा’, ‘महाराजांची राजचिन्हे’, ‘पुरंदऱ्यांची नौबत’ आदी साहित्य प्रसिद्ध झाली आहेत. यातील “राजा शिवछत्रपती’ या त्यांच्या ग्रंथाच्या आत्तापर्यंत १६ आवृत्ती प्रकाशित झाल्या असून ५ लाखांहून अधिक प्रती प्रकाशित झाल्या आहेत.
वयाच्या सहाव्या वर्षांपासून वडिलांच्या बरोबर किल्ले, वाडे, महाल, मंदिरे पाहण्यास त्यांनी प्रारंभ केला. कधी सायकलवरून, कधी पायी, कधी रेल्वेने, कधी जलमार्गाने लक्षावधी मैलांचा प्रवास केला. रात्ररात्र अनेक दप्तरांमध्ये बसून शिवचरित्राची सामग्री गोळा केली. यानंतर बाबासाहेबांचे शिवचरित्र लिहून तयार झाले, पण ते प्रकाशित करण्यासाठी त्यांच्याजवळ पैसा नव्हता. यासाठी बाबासाहेबांनी मुंबईच्या भाजीबाजारात कोथिंबीर विकण्याचा मार्ग निवडला. या शिवगाथेची वाचकांनी अक्षरशः पारायणे केली. या शिवचरित्राचे आचार्य अत्रे यांनीही कौतुक केले, यावेळी अत्रे यांनी ‘मराठा’तल्या अग्रलेखात लिहिले की, “हे शिवचरित्र साऱ्या महाराष्ट्राने अक्षरशः डोक्यावर घेऊन घरभर नाचत सुटावे, इतके सुंदर झाले आहे.
याच शिवचरित्राचे पहिले जाहीर व्याख्यान नागपूरात पार पडले. २५ डिसेंबर १९५४ रोजी शिवचरित्रावर झालेल्या या व्याख्यानासाठी १०० लोकांची उपस्थिती होतीय यापुढेही त्यांनी शिवचरित्र कथनाचा ध्यास घेत जग फिरले. वयाच्या शंभरीतही बाबासाहेबांचा शिवशाहीरी बाणा ताट होता.