मुंबई: समृद्धी महामार्ग सर्वसामान्यांसाठी खुला झाल्यापासून वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. अजूनही हा वाद काही थांबताना दिसत नाही. समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन झाल्यानंतर महामार्गावरील अपघातांची संख्याही वाढली आहे. आता समृद्धी महामार्गावरील सोयी-सुविधांवरून खासदार इम्तियाज जलील यांनी सरकारला लक्ष्य केलं आहे. तसंच, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींसह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सवाल केला आहे. ( why Samriddhi highway was opened for common people MP s question to Nitin Gadkari and Eknath Shinde Devendra Fadnavis )
इम्तियाज जलील यांनी ट्वीट करत सरकारला सवाल केला आहे. तसंच, काही सोयी सुविधा जर समृद्धी महामार्गावर नसतील तर हा महामार्ग सर्वसामान्यांसाठी खुला का केला? असा सवालही उपस्थित केला आहे.
नेमकं काय म्हणाले जलील?
समृद्धी महामार्गावरील नागपूर ते शिर्डी या मार्गाचं लोकार्पण करण्याची घाई सरकारने का केली, असा सवाल खासदार जलील यांनी विचारला आहे. या महामार्गावर स्वच्छतागृहे नाहीत, खाद्यपदार्थांचे स्टॉल नाहीत, पुरेसे पेट्रोल पंप नाहीत, सुरक्षितता आणि सुरक्षा यंत्रणा नसताना नागपूर ते शिर्डीला जोडणारा समृद्धी द्रुतगती मार्ग वाहतुकीसाठी का खुला करण्यात आला? असा सवाल विचारत जलील यांनी समृद्धी महामार्गावरील फोटो शेअर केले आहेत.
महिलांसाठी स्वच्छतागृहे नाहीत हे माहीत असताना एखादी व्यक्ती आपल्या कुटुंबाला एक्स्प्रेस वेवर का घेऊन जाईल? काही प्रश्नांची उत्तरं नसतात, पण एक सूचना आहे- सर्व काही व्यवस्थित होईपर्यंत या महामार्गावर सरकार टोल घेणं का थांबवत नाही? असा सवालही जलील यांनी विचारला आहे.
जलील यांनी यापूर्वीही समृद्धी महामार्गाच्या मुद्यावरून सरकारला खडेबोल सुनावले होते. समृद्धीवरील अपघातांचे प्रमाण वाढतंच चालले आहे. माणसाच्या मृत्यूची किंमत स्वस्त झाली आहे. नुसत्या मुंबईत बसून घोषणा करणे योग्य नाही, सरकारने अपघाताचे स्पॉट निश्चित केले पाहिजे, असं जलील यांनी म्हटलं होतं. विशेष म्हणजे खासदार जलील यांनी थेट मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणीही केली होती.
My question to @nitin_gadkari @mieknathshinde @Dev_Fadnavis why the Samruddhi expressway connecting Nagpur to Shirdi was opened for traffic when there are no toilets, no food stalls, no enough petrol stations, no safety and security apparatus in place. Why then? Why would a… pic.twitter.com/0UZ3cvSMTO
— Imtiaz Jaleel (@imtiaz_jaleel) November 7, 2023
(हेही वाचा: काही नेत्यांना डेंग्यू झालाय, तर काही लपलेयत; पटोलेंचा अजित पवारांसह भाजपला टोला )