नांदेड – नांदेडमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कार्यक्रमस्थळी विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला. पोलीस भरती झाली पाहिजे अशा घोषणा देत विद्यार्थ्यांनी रखडलेली भरती झाली पाहिजे, अशी मागणी केली. यावेळी पोलिसांनी घोषणाबाजी करणाऱ्या तरुणांवर सौम्या लाठीचार्ज केला. यानंतर विद्यार्थ्यांना भेटून काहीही न बोलताच फडणवीस इथून रवाना झाले.
काय घडले –
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या कार्यक्रमासाठी नांदेडमध्ये आले होते. त्यावेळी पोलीस भरतीच्या मागणीसाठी काही आंदोलक विद्यार्थी कार्यक्रमस्थळी दाखल झाले. रखडलेली भरती झाली पाहिजे, अशा घोषणा तरुणांनी फडणवीसांसमोर दिल्या. त्यानंतर पोलिसांना जमाव पांगवण्यासाठी लाठीचार्ज करावा लागला. त्यामुळे आंदोलक विद्यार्थ्यांमध्ये धावपळ उडाली होती. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
दरम्यान नांदेडमधील कार्यक्रमात बोलताना फडणवीस विरोधकांना उत्तर दिले. आजच्या दिवशी आरोप करून दिवसाचे महत्त्व कमी करू नका. हा आजच्या दिवसाचा आपमान ठरेल. औरंगाबाद येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेहमीच्या वेळेआधी ध्वजारोहण करून मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा अपमान केला असा आरोप माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला होता. यावर फडणवीस यांनी ही प्रतिक्रीया दिली. हैद्राबाद येथे मुक्ती संग्राम दिनाचाच कार्यक्रम आहे. तीन राज्याचे मुख्यमंत्री तिथे आहेत. मुख्यमंत्र्यांना लवकर ध्वजारोहन करण्याची काही हौस नाही, असे सांगत आजच्या दिवशी राजकारण करू नये असे फडणवीस म्हणाले.