गेल्या काही दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यात बीड उस्मानाबाद, औरंगाबादमध्ये हजारो एकराचे पीक उद्धवस्त झाले आहे. शेतकऱ्यांची भावना आहे की आधार देणारे पीक कोणते असेल तर ऊसाचे पीक असेल. यंदाच्या वर्षी चांगला पाऊस झाला आहे, त्यामुळे भूगर्भाच्या पाण्याची पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे आगामी कमीत कमी दोन वर्षे भूगर्भातील पाण्याची चिंता नाही. पण शेतकऱ्यांनी ऊसाचे पीक घेण्याची प्रवृत्ती सोडायला हवी. यापुढच्या काळात साखरेवर अवलंबून राहता येणार नाही. तसेच ऊसाच्या पिकावरही अवलंबून राहता येणार नाही. साखर एके साखर कमी करावे लागेल, असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मांडले आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या भूमीपूजनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ते बोलत होते. यापुढच्या काळात इथेनॉलच्या तसेच हायड्रोजनच्या पर्यायाकडे बघण्याची गरज असल्याचे शरद पवारांनी सांगितले.
ऊसाला पर्याय म्हणून इथेनॉलच्या पर्यायाकडे पहावे लागणार आहे. इथेनॉलबाबत केंद्राचे अंतिम धोरण ठरेल. त्याचा परिणाम म्हणजे साखर एके साखर हे धोरण कमी करावे लागेल. साखरेला म्हणजे ऊसाच्या पिकाला मर्यादा आहेत. पण इथेनॉलला मर्यादा येऊ शकत नाही. त्यामुळे आगामी कालावधीत शेतकऱ्यांसाठी योग्य योजना मांडणे, योग्य मानसिकता तयार करणे गरजेचे असणार आहे.
काही दिवसांपूर्वी नॉर्वे येथील लोक मला भेटायला आले होते. इथेनॉलच्या पुढे जाऊन हायड्रोजन गॅस पुढची स्टेप त्यांनी सांगितले. हायड्रोजनच्या माध्यमातून दळणवळणाची साधने, पर्यावरणासाठी अनुकुल अशा हायड्रोजनचा वापर कसा करता येईल यासाठीच्या नव्या कल्पना त्यांनी सुचवल्या. जगातील देश आता हायड्रोजनचा अभ्यास करत आहेत. म्हणून आपल्याकडेही हे नवीन बदल आणि योजना योग्य पद्धतीने मांडणे आणि मानसिकता तयार करणे गरजेचा आहे. यासाठी गडकरींचा पुढाकार महत्वाचा आहे. नगर जिल्हाही ऊसासाठी महत्वाचा जिल्हा आहे. नगर जिल्ह्यांमध्ये एकंदर विकासाच्या दृष्टीने ज्या मागण्या होत्या त्या गडकरींनी पुर्ण केला असल्याचेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा – ‘खडसे साहेब, एखादा शूटर लावून मला मारुन टाका’; शिवसेनेच्या आमदाराची मागणी