राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेत्यांच्या मागे कार्यकर्त्यांचा कोंडाळा काही नवीन नाही. शरद पवारांपासून ते नव्या पिढीतील अनेक आमदारांच्या सोबत देखील अनेक कार्यकर्ते नेहमीच असतात. सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीसोबत सत्तेत आहे. राष्ट्रवादीच्या अनेक मंत्र्यांचा आठवड्याच्या ठराविक दिवशी जनता दरबार असतो. मात्र आज राष्ट्रवादीच्या मुंबईतील कार्यालयात एका वेगळ्याच जनता दरबाराची चर्चा होती. खासदार सुप्रिया सुळे या आज प्रदेश कार्यालयात आल्या असताना त्यांना भेटण्यासाठी राज्यभरातून सामान्य लोक, कार्यकर्ते, पदाधिकारी आले होते. विशेष म्हणजे मुंबईत ट्रेन बंद आहेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अजूनही पुर्णपणे खुली झालेली नसतानाही राज्यभरातून शेकडो लोक सुप्रिया सुळेंना भेटण्यासाठी आले होते.
सुप्रिया सुळे यापुढे प्रत्येक मंगळवारी पक्ष कार्यालयात जनता दरबार घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत त्या प्रदेश कार्यालयात लोकांना भेटतील. कोरोनाच्या संक्रमणामुळे राज्यातील महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणूका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. तर काही निवडणुका आता नव्याने लागणार आहेत. शहरी भागाच्या नागरी प्रश्नांची उत्तम जाण असलेल्या सुप्रिया सुळे या निवडणुकांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. त्यामुळे पक्ष कार्यालयातील जनता दरबाराच्या माध्यमातून सुप्रिया सुळे आगामी निवडणुकांसाठी पक्ष संघटना बळकट करण्याचा नक्कीच प्रयत्न करतील.
केंद्र सरकारचा हस्तक्षेप निंदनीय
महाराष्ट्र सरकारने मेट्रो कारशेडसाठी कांजूरमार्ग येथील जागा निश्चित केल्यानंतर केंद्राने त्यावर क्षेप घेतला आहे. जनता दरबारानंतर सुप्रिया सुळेंना मेट्रो कारशेडबाबत माध्यमांनी प्रश्न विचारला असता त्या म्हणाल्या की, ज्याचे सगळे अधिकार काढून घेण्याचे पाप केंद्र सरकार करते आहे. महाराष्ट्र राज्याच्या विकासामध्ये केंद्रसरकार हस्तक्षेप करतेय हे निंदनीय आहे. ती जमीन महाराष्ट्राची आहे. ज्या राज्याची जमीन असते त्यावर पहिला अधिकार हा त्याच राज्याचा असतो. केंद्रसरकार हळूहळू आणीबाणी आणतंय असं चित्र आहे, असेही खासदार सुप्रियाताई सुळे म्हणाल्या.