घरताज्या घडामोडीदादा, ज्याचं जळतं... पत्राद्वारे सुषमा अंधारेंची राज ठाकरेंवर खरमरीत टीका

दादा, ज्याचं जळतं… पत्राद्वारे सुषमा अंधारेंची राज ठाकरेंवर खरमरीत टीका

Subscribe

महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला असला तरी या सोहळ्याला गालबोट लागलं आहे. या सोहळ्यात उपस्थित असलेल्या आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या श्री सदस्यांचा उष्माघातामुळे मृत्यू झाला. या घटनेवरून आता राज्याचं राजकारण चांगलंच तापलंय. कोरोनाच्या काळातही हलगर्जीपणा झाला आहे. त्यामुळे त्याठिकाणी आजही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करता येऊ शकतो, असे म्हणत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. दरम्यान, उद्धव ठाकरेंना लक्ष्य केल्याने ठाकरे गटाच्या उपनेत्या सूषमा अंधारे यांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे. सुषमा अंधारे यांनी राज ठाकरे यांना खुलं पत्र लिहून त्यांची कोंडी केली आहे.

काय लिहिलंय पत्रात?

- Advertisement -

प्रति श्री राज ठाकरे
अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना
सस्नेह जय महाराष्ट्र !
वि. वि. पत्र लिहिण्यास कारण की, इंटरनेट आणि ई-मेलच्या युगामध्ये आजही आपण पत्रलेखनासारखी आपली अत्यंत प्राचीन परंपरा जतन आणि संवर्धन करीत आहात त्यामुळे पत्राद्वारे हा संवाद आपल्याशी साधण्याचा प्रयत्न करत आहे.
खारघर दुर्घटनेच्या संदर्भात किमान चार दिवसांनी का होईना काल आपण व्यक्त झालात हे एका अर्थी बरे झाले..!
घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे आणि त्यावर कोणीही राजकारण करू नये असे आपले म्हणणेही अगदी समायोचित आहे. पण पुढे आपण कोरोना काळात हलगर्जीपणा झाला वगैरे वगैरे असे म्हणत उध्दव साहेबांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची ही भाषा केली.
आपण अत्यंत सिलेकटीव्ह पद्धतीने व्यक्त झाला त्या संदर्भात काही प्रश्न उद्भवतात आणि ते विचारलेच पाहिजेत असे वाटते.

दादा,

- Advertisement -

( हे संबोधन दहशतीवाला दादा या अर्थाने नाही तर मोठा भाऊ या अर्थाने वापरले आहे)

मुद्दा क्रमांक एक : कोरोना महामारी ही उद्धव ठाकरे निर्मित नाही तर निसर्गनिर्मित होती हे आपल्याला ज्ञात असेलच.
पण खारघर मध्ये घडलेली दुर्घटना ही मानवनिर्मित आहे कृपया याची नोंद घ्यावी.

मुद्दा क्रमांक दोन : भारतरत्न सारखा पुरस्कार एका हॉलमध्ये दिला जातो आणि त्याचे प्रक्षेपण जगभर केले जाते. तर महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी एवढ्या मोठ्या गर्दी आणि सभेची गरज होती काय? गर्दीचे प्रशासकीय नियोजन का केले गेले नव्हते?

मुद्दा क्रमांक तीन : श्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या लोकप्रियतेचा फायदा घेत मुळात ही गर्दीच राजकीय हेतूने प्रेरित होऊन शिंदे फडणवीस सरकारने एकत्रित करण्याचा प्रयत्न केला. तर याचे राजकारण करू नका असे म्हणणे कितपत संयुक्तिक ठरते.

मुद्दा क्रमांक चार : कोरोना काळात मुख्यमंत्री निधीला सहाय्यता देण्याच्या ऐवजी खाजगी पीएम केअर फंड मध्ये निधी द्या असे म्हणणारे श्री देवेंद्र फडणवीस ची कोरोना काळात राजकारण करत नव्हते का?

मुद्दा क्रमांक पाच : गर्दी टाळणे हाच मोठा उपाय असताना सुद्धा मंदिरे उघडलेच गेले पाहिजेत यासाठी सुपारीबाज लोकांना पुढे करून करून राज्यातली एकूण व्यवस्था अस्थिर करण्याचा प्रयत्न करणारे भाजपाई नेते राजकारण करत नव्हते का ?

मुद्दा क्रमांक सहा : सर्व धर्मीय प्रार्थना स्थळे बंद असताना, जशी मंदिरे बंद होती वारी बंद होती तशी आंबेडकरजयंती सुद्धा साजरी झालीच नव्हती. पण मंदिरेच कशी बंद राहिली अशी आवई उठवत जाणीवपूर्वक मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्री यांना एवढ्या गंभीर काळामध्ये सहकार्य करायचे सोडून त्यांच्या कामात अडथळे आणण्याचे प्रयत्न करणारे भाजप नेते राजकारण करत नव्हते का ? असू द्या दादा मी आपल्याला फार अडचणीत आणणारे प्रश्न विचारणार नाही.

पण ज्याचं जळतं त्यालाच कळतं. आपल्या पक्षातल्या देशपांडे नावाच्या एका कार्यकर्त्याला साधे खरचटलेही नव्हते तरी सुद्धा आपण काय तातडीने रुग्णालयाकडे धाव घेतली. बापरे , आपली ती शून्यात हरवलेली नजर माध्यमे वारंवार दाखवत होते. दादा , खारघरच्या दुर्घटनेनंतर मृतांच्या नातेवाईकाला आपण असेच धावतपळत भेटायला गेलात का नाही ?

शेवटचा मुद्दा: कोरोना काळामध्ये माजी मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या कामाची दखल फक्त भारतात नाही तर जगभरात घेतली गेली आंतरराष्ट्रीय न्यायालय आणि दस्तूर खुद्द पंतप्रधान मोदीजींनी सुद्धा श्री उद्धव ठाकरे यांच्या कोरोना कामगिरीचे कौतुक केले. “धारावी पॅटर्न” तर जगभर गाजला.

या उलट कोरोना काळात उत्तर प्रदेश मध्ये मात्र गंगा नदीवर प्रेतं तरंगलेली उभ्या जगाने पाहिली. प्रेतांची विल्हेवाट व्यवस्थित न लावल्यामुळे कोरोनाचा फैलाव उत्तर प्रदेशमध्ये अधिक प्रमाणात झाला. हा हलगर्जीपणा करणाऱ्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या संदर्भात आपण काही सुतोवाच करणार आहात का?

असो , आपल्या मनात नसला तरी बहीण म्हणून माझ्या मनात कायमच स्नेहभाव आहे वृद्धिगंत व्हावा.

आपली बहीण
सुषमा अंधारे

कोरोनातही अनेकप्रकारचा हलगर्जीपणा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिष्टमंडळासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सह्याद्री अतिथीगृहावर भेट घेतली. या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना जोरदार टोला लगावला. राज ठाकरे म्हणाले की, कोरोनाच्या काळातही अनेकप्रकारचा हलगर्जीपणा झाला आहे. त्यामुळे त्याठिकाणी आजही सदोष मनुष्यवधाचा खटला दाखल करता येऊ शकतो.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

कडक उन्हाळा असताना अशा परिस्थितीत जर असे कार्यक्रम केले तर अजून काय होणार? त्यामुळे समिती वगैरे स्थापन करण्याच्या भानगडीत न पडता सरळ कार्यक्रमाच्या आयोजकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली होती.

दरम्यान, सुषमा अंधारे यांच्यानंतर खासदार संजय राऊत यांनी देखील राज ठाकरेंवर टीका केली. भाजपने एवढे पोपट पाळून ठेवले आहेत. त्यांना बोलू दया. तसेच त्यांना पोपटपंची करू द्या. नोटबंदीच्या रांगेत हजारो लोक मेले हा सदोष मनुष्यवधच आहे ना?, त्यावरही या भाजपच्या पोपटांना बोलायला सांगा. गंगेत हजारो प्रेतं वाहत आली. गुजरातला स्मशानात जागा नव्हती. मग गुजरात आणि उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी राज ठाकरे यांनी करायला हवी. ते जगाचे नेते आहेत. ते ट्रम्पवरही बोलू शकतात. मग करा मागणी, असं म्हणत संजय राऊतांनी राज ठाकरेंवर टीका केली.


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -