लॉकडाऊन उठवितानाचा राज्य सरकारचा नेमका एक्झिट प्लॅन काय आहे हे सरकारने आधीच जाहीर करावे. अनेक कंटेनमेंट भागांमध्ये पोलिसांना गृहित धरून गर्दी होत आहे. अशा ठिकाणी सरळ एसआरपीएफच्या तुकड्या तैनात करण्यात याव्यात. राज्यातील परप्रांतीय मजूर बाहेर पडत आहेत, त्यामुळे कारखान्यांमध्ये ज्या रिकाम्या जागा आहेत त्यांची माहिती महाराष्ट्रातील तरूण-तरूणींना देवून त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. सध्याच्या परिस्थितीत केंद्र किंवा राज्य सरकारवर आपण टीका करणार नाही असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयात सर्वपक्षीय नेत्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने संवाद साधला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना देखील यावेळी, मंत्रालयात बोलावण्यात आले होते. या बैठकीत राज ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली.
एसआरपीएफच्या तुकड्या लावा
राज्यातील अनेक कंटेनमेंट भागांमध्ये पोलिसांना गृहित धरूनच काम सुरू आहे. रमजानचा महिना सुरू आहे. अनेक ठिकाणी गर्दी होते. लोक बाहेर पडतात. अनेक सण आतापर्यंत घरात राहूनच साजरे केले. त्यामुळे मुस्लिम समाजानेही त्याचा विचार करावा. जर विचार होत नसेल तर या ठिकाणी अधिक फोर्स लावणे गरजेचे आहे. जेणेकरुन या गोष्टी बंद होतील. पोलिसांवरही गेला दीड महिना प्रचंड ताण आहे. ते थकले आहेत. त्यामुळे अशा ठिकाणी एसआरपीएफ म्हणजे राज्य राखीव दलाच्या तुकड्या बंदोबस्तासाठी तैनात करण्यात याव्यात, अशी मागणी राज ठाकरे यांनी या बैठकीत केली.
आता स्थानिकांना रोजगार दया
परप्रांतातील कामगार आता आपापल्या राज्यात परत चालले आहेत. आता ते गेले म्हणजे इथले कारखाने बंद ठेवायचे का? महाराष्ट्रातील कारखाने उद्योग बंद होऊ नयेत, म्हणून राज्यातील तरुण तरुणींना ज्या ठिकाणी रोजगार उपलब्ध आहेत त्याची माहिती द्यावी. आपल्याकडे विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आदी ठिकाणी त्यांना रोजगाराविषयी माहिती नसते त्यांना सगळी माहिती देण्यात यावी. तसेच परप्रांतीय कामगारांना परत आल्यावर तपासणी केल्याशिवाय महाराष्ट्रात घेऊ नये. कारण त्या राज्यात काय परिस्थिती आहे हे आपल्याला माहिती नाही. आपल्याकडे चाचण्या होत आहे. तिकडे काय चाललंय हे आपल्याला माहिती नाही. ज्या पद्धतीने ते महाराष्ट्रातून गेले आहेत. ते जेव्हा परत येतील किंवा आणले जातील त्यांची तपासणी केल्याशिवाय आत घेऊ नये. तसेच त्याच वेळी त्यांची ‘राज्य स्थलांतरित कायद्या’खाली नोंदणी करुन घ्यावी. हीच ती वेळ आहे, नंतर ते करता येणार आहे. कारण आतापर्यंत जो गुंता झाला तो सोडवता येऊ शकतो.
सरकारी कर्मचारी, पोलीस, सफाई कामगारांची काळजी घ्या
सरकारी कर्मचारी, पोलीस ते सफाई कामगार अशा अत्यावश्यक सेवेत येणाऱ्या सर्वांच्या सुरक्षेची काळजी घ्या. सफाई कामगार आजारी पडत आहेत, त्यांनी हात वर केले, तर शहरांची अवस्था काय होईल? त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष द्या. छोटे दवाखाने सुरु करावेत. आजारी पडल्यानंतर दाखवायचं कोणाला असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्या ठिकाणी एखादा पोलीस असावा. कारण रांगा लागतील तेव्हा नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस असावा. स्पर्धा परीक्षांसाठी आलेल्या तरुणांना घरी जाण्यासाठी किंवा जे लोक हॉस्टेलमध्ये अडकलेले आहेत त्यांच्यासाठी काही व्यवस्था करता येईल ती करावी. त्याचसोबत आता शाळांचे प्रवेश सुरू होणार आहेत. ई -लर्निंग प्रत्येक ठिकाणी शक्य नाही. त्यामुळे शाळा कशा प्रकारे पुन्हा सुरू करणार याचीही कल्पना पालकांना दयावी, अशी मागणी केल्याचेही राज ठाकरे यांनी सांगितले.