केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर ते पहिंल्यांदाच नागपुरात आले. शनिवारी नागपुरात आल्यावर त्याचे जंगी स्वागत करण्यात आले. त्यानंतर त्यांनी नागपुरात पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत त्यांनी मोदी सरकारची पुढील पाच वर्षांच्या विविध धोरणांविषयी माहिती दिली. यापुढे आपले रोजगार निर्मितीकडे आणि देशाची जीडीपी जास्त लक्ष असणार असल्याचे गडकरी म्हणाले आहेत.
नेमकं काय म्हणाले नितीन गडकरी?
‘अजून कोणतेही टार्गेट सेट केलेले नाही. मात्र लघू उद्योग आणि रोजगार निर्मिती करणे हे माझ्यापुढचे मोठे लक्ष्य आहे. नवीन योजना आणायच्या आहेत. याशिवाय ग्रामीण भागात देखील रोजगारासाठी महत्त्वाची कामे करायची आहेत. सध्या देशाच्या विविध भागात रस्त्याची कामे सुरु आहेत. तीन वर्षात सर्व महामार्गाची कामे पुर्ण होतील. याशिवाय रस्त्यालगत १२५ कोटी वृक्ष लागवड करायची आहे. यासोबतच मार्च २०२० पर्यंत गंगा शुद्धीकरणाचे काम करणार आहोत.’, असे गडकरी म्हणाले. त्याचबरोबर देशातील सर्व सिंचन प्रकल्पही पूर्ण करणार असल्याचे आश्वासन नितीन गडकरी यांनी दिले आहे.