गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील महापुरुषांबाबत आक्षेपार्ह विधानं केली जात आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात वादंग निर्माण झाला होता. दरम्यान, या विधानानंतर भाजप आणि शिंदे गटातील नेत्यांकडून निषेध व्यक्त केला होता. हा वाद सुरू असतानाच भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
उदयनराजे भोसले यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, सर्वधर्म समभाव ही संकल्पना छत्रपती शिवाजी महाराजांची होती. कुठल्याही जातीधर्मातील लोकांशी त्यांनी भेदभाव केला नाही. प्रत्येक राजकीय पार्टी आपापल्या सोयीने बोलत असते. पण छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजी महाराजांनी कधीही कुठल्या धर्माचा अनादर केला नाही. त्यामुळे यावरून कुठलाही वाद निर्माण करू नये, असं उदयनराजे भोसले म्हणाले.
त्यांनी त्या काळात अनेक मंदिरांसोबत मशिदीही बांधल्या. साताऱ्यात शाही मशिदीची देखरेख आजही आमच्या कुटुंबाकडून होते. छत्रपती संभाजी महाराज किंवा छत्रपती शिवाजी महाराज हे दोघंही स्वराज्यरक्षक होते. त्यांनी सगळ्या धर्मांचा आदर केला म्हणून धर्मरक्षकही होते, असे उदयनराजे भोसले यांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी महापुरुषांबाबत बोलताना आजवर मी कुठल्याही महापुरुषाबद्दल, स्त्रियांबद्दल चुकीचं बोललो नाही. मला भाजपने मला विरोधी पक्ष नेते पद दिले नाही, राष्ट्रवादीचे विधानसभेचे ५३ आमदार आहेत, त्यांनी हे पद दिले आहे. मला पदावर ठेवायच की नाही हा राष्ट्रवादीच्या आमदारांचा अधिकार आहे. बाकीच्यांना ती मागणी करण्याचा काडीचा अधिकार नाही, म्हणत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानावर ठाम असल्याचे जाहीर केले होते.
हेही वाचा : मी कुठल्याही महापुरुषांबद्दल चुकीचं बोललो नाही, अजित पवार त्या वक्तव्यावर ठाम