विधानसभा निवडणूक निकालामुळे पंजाबमध्ये जो बदल झाला आहे तो भाजपला अनुकूल नाहीच. मात्र हा बदल कॉंग्रेसला धक्का देणारा आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी पाच राज्यांच्या निवडणूक निकालावर बोलताना दिली. पाचपैकी चार राज्यात मिळालेल्या घवघवीत यशामुळे भाजपचा आत्मविश्वास वाढला असून महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी ‘अभी महाराष्ट्र बाकी है” अशी प्रतिक्रिया दिली आहे. या प्रतिक्रियेला उत्तर देताना अभी महाराष्ट्र बाकी है तो महाराष्ट्र भी तैयार है, असे जोरदार उत्तर देत भाजपच्या विरोधातील लढा सुरूच राहणार असलायचे सांगितले.
उत्तरप्रदेश, पंजाबसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. या निकालावर प्रतिक्रिया व्यक्त करताना पवार म्हणाले, पंजाबमध्ये कॉंग्रेसची सत्ता होती. तिथे आज अतिशय वेगळे चित्र बघायला मिळत आहे. ‘आप’ हा अलीकडे तयार झालेला राजकीय पक्ष आहे. त्याने दिल्लीत गेल्या दोन निवडणुकांमध्ये ज्या प्रकारे यश संपादन केले, ज्यापध्दतीने प्रशासन दिले त्याने दिल्लीतील सर्वसामान्यांच्या मनात घर केले आहे. पंजाब हे दिल्लीच्या सीमेवरील राज्य आहे. दिल्लीच्या कामाचा परिणाम पंजाबमध्ये स्वच्छ दिसतो आहे.
लोकशाहीत लोकांनी जो कौल दिला त्याचा स्वीकार आणि सन्मान करायला हवा. आज देशात प्रभावशाली पर्याय देण्यासाठी किमान समान कार्यक्रमाच्या आधारावर चर्चा होऊ शकते. ही चर्चा लगेचच होईल असे नाही. आता संसदेचे अधिवेशन १४ मार्चपासून सुरू होत आहे. एक महिना सर्व सदस्य दिल्लीत असणार आहेत. आता पुढची रणनीती ठरवण्यासाठी पाऊले उचलून लोकशाही मजबूत करण्यासाठी लोकांना सहकार्य करण्यासाठी पुढे आणणे हे कर्तव्य आहे, असेही शरद पवार यांनी सांगितले.