घरक्रीडाक्रीडा विद्यापीठाच्या माध्यमातून खेळांना गती!    

क्रीडा विद्यापीठाच्या माध्यमातून खेळांना गती!    

Subscribe

भारतातील पहिले आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ पुण्याच्या बालेवाडी येथे स्थापन करण्यात येणार आहे.  

क्रीडा क्षेत्रासाठी देशात नेहमीच अव्वल असणाऱ्या महाराष्ट्रात आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ स्थापन करून जागतिक दर्जाचे खेळाडू तयार करण्याचे स्वप्न महाराष्ट्राचे क्रीडामंत्री सुनील केदार यांनी पाहिले. राज्यातील खेळाडू आणि प्रशिक्षक यांना उच्च दर्जाचे क्रीडा प्रशिक्षण देऊन एखाद्या खेळाडूने ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवावे हा ध्यास सुनील केदार घेतला आहे. त्याबाबत क्रीडा पत्रकार अविनाश ओंबासे यांनी त्यांच्याशी केलेली बातचीत…

  • कोरोनाचा राज्यातील क्रीडा क्षेत्रावर परिणाम झाला आहे. यातून बाहेर पडण्यासाठी पुढील काळात तुमची काय योजना आहे?  
    – कोरोनामुळे जगाचे क्रीडा क्षेत्र ढासळले असून कोरोनानंतर सावरण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागाच्या वतीने राज्यातील खेळाडूंसाठी विशेष स्तरावर इव्हेंट आयोजित केले जाणार आहेत. जेणेकरून खेळाडूंना स्पर्धेसाठी चालना मिळेल. कोरोनामुळे मागील वर्षी कोणत्याही स्पर्धा होऊ शकल्या नाहीत. मात्र, कोरोनानंतर आम्ही शासन स्तरावर या खेळाडूंसाठी विशेष स्पर्धा आयोजित करून सर्व खेळाडूंना संधी देऊन सामावून घेणार आहोत.
  • राज्यातील क्रीडा क्षेत्राला गती देण्यासाठी शासनाने काही विशेष योजना आखली आहे का?
    – राज्यातील क्रीडा क्षेत्राला आम्ही नक्कीच प्राधान्य देणार असून राज्यामध्ये सर्वप्रथम आम्ही आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा विद्यापीठ सुरू करणार आहोत. त्या माध्यमातून खेळाडू, प्रशिक्षक यांना उच्च दर्जाचे प्रशिक्षण देऊन ऑलिम्पिक आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू कसे तयार होतील याकडे आमचे लक्ष असणार आहे.
  • राज्यातील खेळाडूंना ऑलिम्पिकमध्ये यश मिळावे यासाठी शासन कशाप्रकारे प्रयत्न करत आहे?
    – देशातील सर्वात विकसित राज्य म्हणून आपण आपल्या महाराष्ट्र राज्याचा नेहमीच उल्लेख करतो. परंतु, महाराष्ट्राच्या खेळाडूने अजून ऑलिम्पिकमध्ये एकही सुवर्णपदक मिळवले नाही याची मला खंत आहे. ऑलम्पिक स्पर्धेत आपल्या खेळाडूंनी पदके मिळवावीत यासाठी महाराष्ट्र शासन पुणे बालेवाडी येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठामध्ये विशेष प्रशिक्षण मोहीम राबवणार आहे.
  • राज्यात विविध खेळांसाठी शासनाच्यावतीने बारा-तेरा क्रीडा प्रबोधिनी सुरू असून त्याचा विस्तार किंवा काही बदल करणार आहात का?
    – क्रीडा प्रबोधिनींचा विस्तार आणि त्यांची संख्या वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. तसेच क्रीडा प्रबोधिनींना नवे रूप देण्याचा आम्ही प्रयत्न करणार असून त्यामधून खेळाडूंना प्रशिक्षण देऊन उच्च दर्जाचे खेळाडू घडवण्याला आम्ही प्राधान्य देणार आहोत.
  • शासनाच्या स्पर्धा लवकर संपण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु, त्यामुळे त्यांचा दर्जा घसरत चालला आहे. त्याबाबत काय सांगाल?
    – शासनाच्या असोसिएशन अंतर्गत आयोजित होणाऱ्या स्पर्धांचा दर्जा सुधारण्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करणार असून या स्पर्धांसाठी आम्ही क्लब स्तरावर अकादमी संस्थांचीही मदत घेणार आहोत. त्यांनाही या स्पर्धेमध्ये समाविष्ट करून या स्पर्धा कशा व्यवस्थितरित्या संपन्न होतील हे आम्ही पाहणार आहोत.
  • राष्ट्रीय स्तरावर सर्व खेळाच्या प्रशिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी ‘साई’ जसे काम करत आहे, त्या धरतीवर राज्यातील प्रशिक्षकांसाठी कोणती योजना सुरू करण्याचा मानस आहे का?
    – राष्ट्रीय स्तरावर स्पोर्ट्स अ‍ॅथोरिटी ऑफ इंडिया (साई) उत्तमरित्या प्रशिक्षण देण्यासाठी देशभर कार्य करत असून साईच्या तोलामोलाची प्रशिक्षण संस्था पुणे येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विद्यापीठामध्ये आपण नक्कीच सुरू करणार आहोत. त्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांच्या वतीने राज्यातील प्रशिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी माझा मानस आहे. राज्यातील प्रशिक्षक उच्च दर्जाचे तयार झाले पाहिजेत यासाठी क्रीडा विद्यापीठामध्ये आपण त्यांना स्पोर्ट्स टेक्नॉलॉजी, मेडिटेशन, खेळातील सर्व बारीक हालचाली यासाठी प्रशिक्षण सुरू करणार आहोत.
  • राज्यातील शासनाच्या क्रीडा पुरस्कारांमध्ये क्रीडा शिक्षक हा नेहमीच दुर्लक्षित घटक राहिलेला आहे. क्रीडा शिक्षकांसाठी एखादा पुरस्कार सुरू करण्यासाठी काही विचार आहे का?
    – शिक्षक हे खेळाडूंचा पाया भक्कम करत असतात. त्यांनाही खेळाडूच्या विजयामध्ये कुठेतरी वाटा मिळणे गरजेचे आहे. त्यामुळेच आम्ही क्रीडा शिक्षकांसाठी विशेष राज्य पुरस्कार सुरू करण्याचा विचार करत असून याचाही लवकर निर्णय होईल.
  • राज्य शासनाच्या क्रीडा विभागाच्या क्रीडा व युवक संचालनालयला पन्नास वर्षे पूर्ण झाली. त्या अनुषंगाने काही कार्यक्रम हाती घेणार आहात का?
    – आम्ही विविध कार्यक्रम हाती घेणार आहोत. आताची युवा पिढी सोशल मीडियाच्या वापरात दररोज दिवसातले सात ते आठ तास वाया घालवत असून ते यामधून बाहेर येऊन क्रीडा क्षेत्राकडे कसे वळतील आणि त्यांचा मानसिक, शारीरिक व्यायाम कसा होईल हे आम्ही पाहणार आहोत.

 

- Advertisement -

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -