मुंबईः राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि शिवसेनेचे नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यात सध्या वाकयुद्ध सुरू झालंय. शिवसेनेनं अहंकारामुळे हातचं सगळं घालवू नये, असा टोला जितेंद्र आव्हाडांनी शिवसेनेला काल लगावला होता. त्यालाच आता एकनाथ शिंदेंनी प्रत्युत्तर दिलंय. शिवसेना फायदा आणि तोट्याचा विचार करत नाही, असं प्रत्युत्तर सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदेंनी आव्हाडांना दिलंय.
महाविकास आघाडीत कोणाची मनं दुखावणार नाहीत, त्याचा विचार करावा, असा सल्लाही एकनाथ शिंदे यांनी आव्हाडांना दिलाय. ठाणे जिल्ह्याच्या महापालिका निवडणुका एप्रिल महिन्यात होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर युती होण्यावरून बेबनाव सुरू झालाय. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात काम करतेय. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येदेखील अनेक ठिकाणी आघाडी झालेली आहे. तशी आघाडी व्हायला मला वाटत नाही, काही अडचण असेल.
फक्त दोन्ही पक्षाच्या लोकांनी आघाडीपूर्व जो काही कालावधी आहे, त्यात सामंजस्यपणा घेण्याची आवश्यकता आहे. त्यांच्या मनात काय आहे मला माहीत नाही, पण आमचं अगदी स्पष्ट आहे. आम्ही काहीही लपून काम करत नाही. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतही काही अडचण येण्याचं कारण नाही. शिवसेनेची भूमिका स्पष्ट आहे, दोन्ही पक्षाच्या लोकांनी सामंजस्यपणाची भूमिका घेण्याची आवश्यकता असते. वरिष्ठांनीसुद्धा चर्चा करताना, कुठलंही भाष्य करताना महाविकास आघाडीमध्ये दुही निर्माण होईल, अशी वक्तव्ये करू नयेत. मी महाविकास आघाडी, राष्ट्रवादी, काँग्रेसच्या विरोधात कधीही भाष्य केलेलं नाही, असंही एकनाथ शिंदे म्हणालेत.