‘टीका करणाऱ्यांना प्रत्युत्तर देऊ नका. आपण आपले काम करत राहू. चांगल्या कामांमधून त्यांना प्रत्युत्तर देऊ’, असे युवासेना प्रमुख आणि वरळी मतदारसंघाचे आमदार आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. दोन दिवसांपूर्वी वडाळा येथील एका व्यक्तीने सोशल मीडियावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर शिवसैनिकांनी त्या व्यक्तीला मारहाण करत त्याचे मुंडन केले होते. या घटनेनंतर आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांना संयम बाळगण्याचा सल्ला दिला आहे.
हेही वाचा – उद्धव ठाकरेंच्या विरोधात पोस्ट; शिवसैनिकांनी बजरंग दलाच्या कार्यकर्त्याचे केले मुंडन
काय आहे प्रकरण?
नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरुन देशभरात रान पेटले आहे. दिल्लीत जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी या कायद्याच्या विरोधात मोठे आंदोलन केले. या आंदोलनात पोलिसांकडून आंदोलक विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला. या घटनेची तुलना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘जालियनवाला बाग हत्याकांड’शी केली होती. त्यांच्या याच वक्तव्यावरुन एका व्यक्तीने सोशल मीडियावर उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. सोशल मीडियावर उद्धव ठाकरेंवर टीका केली म्हणून काही शिवसैनिकांनी त्या व्यक्तीला मारहाण केली आणि त्याचे मुंडनही केले. या घटनेनंतर आदित्य ठाकरे यांनी ट्रोल करणाऱ्यांकडे लक्ष न देण्याचा सल्ला शिवसैनिकांना दिला आहे. त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर याबाबत शिवसैनिकांना आवाहन केले आहे.
हेही वाचा – ‘मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या’; मुख्यमंत्र्यांचे मोदींना पत्र
शांतपणे, मुख्यमंत्र्यांच्या पाठिमागे उभे राहुया – आदित्य ठाकरे
‘आपण आपल्या मुख्यमंत्र्यांच्या पाठिमागे उभे राहुया. जनतेसाठी काम करुया आणि त्यांचे मनेही जिंकुया. ट्रोल करणाऱ्यांकडे लक्ष्य देऊ नका’, असे आदित्य ठाकरे म्हणाले. त्याचबरोबर ‘जनतेला दिलेल्या आश्वासनांची पुरेपूर पूर्तता करणे हेच या ट्रोल करणाऱ्या लोकांना आपले उत्तर असेल. रोजगार निर्माण करुन देशाचा आर्थिक विकास करणे हे या ट्रोल करणाऱ्यांना उत्तर असेल. जे आज नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विनाकारण विरोध करणारे नेते आहेत ते या गोष्टी करु शकणार नाहीत. ट्रोल करणाऱ्यांना करु द्या, तुम्ही शांत राहा’, असेही आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.
Our statement on trolls and reactions. pic.twitter.com/AvTUnAZo5H
— Aaditya Thackeray (@AUThackeray) December 24, 2019