सध्या अपघाताचे प्रमाण वाढत आहेत. अनेकदा चालकाच्या हलगर्जीपणामुळे हे अपघात होत असल्याचे समोर आले आहे. असा एक अपघात आज सकाळी नवी मुंबईत घडला. नवी मुंबईत गुरुवारी सकाळी तीन वाहनांचा विचित्र अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या ट्रेलर चालकाचा गाडीवरचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये सुदैवाने जिवीतहानी झाली नसली तरी मात्र सहा जण जखमी झाले आहेत. जखमींना नवी मुंबईच्या डी वाय पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून जखमींवर उपचार सुरु आहेत.
असा घडला अपघात
नवी मुंबईच्या नेरुळ पुलावर अपघात झाला आहे. या अपघातात सहा जण जखमी झाले आहेत. पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या ट्रेलर चालक नेरुळ पुलावर पोहोचला. त्यादरम्यान त्याचा गाडीवरचा ताबा सुटला आणि त्याची गाडी समोरच्या गाडीला जाऊन धडकली. ही धडक भीषण असल्याने ती गाडी पुढच्या गाडीवर जाऊन आदळली आणि हा अपघात झाला. या अपघातामध्ये गाडीचा अक्षरश: चकाचूर झाला आहे. या अपघातामुळे ठाणे – बेलापूर रोडवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे.