महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणाचा खटला येत्या वर्षभरात निकाली काढा असे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. मागच्या वर्षी आजच्या दिवशीच बेपत्ता झालेल्या अश्विनी बिद्रे यांची हत्या झाल्याचे उघड झाले होते. याप्रकरणाच खटला एक वर्षात निकाली काढा असे आदेश कोर्टाने दिले आहेत. त्यामुळे अश्विनी बिद्रे यांच्या कुटुंबियांना लवकरच न्याय मिळणार आहे. कोर्टाच्या आदेशामुळे आपण समाधानी असल्याची प्रतिक्रीया अश्विनी बिद्रे यांचे पती राजू गोरे यांनी दिली आहे. पोलीस प्रशासन आणि राज्य सरकारच्यावतीने दडपल्या जाणाऱ्या या प्रकरणाला एक नवी दिशा मिळेल अशी प्रतिक्रिया देखील त्यांनी दिली आहे.
याप्रकरणाकडे केले जात होते दुर्लक्ष
कोल्हापूर जिल्ह्यातील महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे या मुंबईतून बेपत्ता झाल्या होत्या. पोलीस अदिकारी अभय कुरुंदकर आणि त्यांच्या सहकऱ्यांनी मिळून अश्विनी यांची निर्घृण हत्या केली होती. आरोपी वरिष्ठ पोलीस अधिकारी असल्यामुळे पोलिसांनी या खून प्रकरणाकडे दुर्लक्ष केले होते.
प्रसारमाध्यमांमुळे प्रकरण झाले उघड
३१ जानेवारी २०१७ रोजी अश्विनी बेपत्ता असल्याचा गुन्हा कळंबोली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला. या प्रकरणात काहीच बाहेर येत नसल्याने १६ नोव्हेंबर २०१७ रोजी प्रसार माध्यमांच्या समोर हा विषय आला. अश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरण केवळ प्रसार माध्यमांमुळे बाहेर आले . प्रसार माध्यमांनी बातम्या दाखविल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली असे यावेळी अश्विनी बिद्रे यांचे पती राजू गोरे यांनी सांगितले होते.
बिद्रे कुटुंबियांची कोर्टात धाव
अश्विनी बिद्रे यांच्या कुटुंबियांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्याच्याकडे हा खटल्याला गती देण्याची मागणी केली होती. मात्र शासनाने आणि पोलिसाने याकडे लक्ष दिल्यामुळे अश्विनी यांच्या कुटुंबियांनी थेट मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. हे प्रकरण जलद गतीने चालवण्यात यावे अशी मागणी त्यांनी कोर्टाकडे केली होती. एका वर्षानंतर कोर्टाने या प्रकरणाचा विचार करुन हे प्रकरण एका वर्षात निकाली काढावा असे आदेश दिले आहेत.