काँग्रेसमधील दिवंगत नेते गुरुदास कामत यांचे भाचे व माजी नगरसेवक समीर देसाई यांनी भाजपमधील अंतर्गत गटबाजीला कंटाळून अखेर भाजपला रामराम ठोकत भगवा हाती घेत शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक अवघ्या एका वर्षावर येऊन ठेपली असताना शिवसेनेत ‘इनकमिंग’ सुरू झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मातोश्री येथे भगवे ‘शिवबंधन’ बांधून घेत समीर देसाई यांनी आज जाहिररित्या शिवसेनेत प्रवेश केला. काँग्रेसमध्ये समीर देसाई ते नगरसेवक असताना आपल्या अभ्यासाच्या व वक्तृत्वाच्या जोरावर त्यावेळी मुंबई महापालिका चांगलीच गाजवली होती. त्यावेळी काँग्रेसचे राजहंस सिंह हे विरोधी पक्षनेते असताना समीर देसाई हे राजहंस यांच्या अनुपस्थितीत विरोधी पक्षनेत्याची भूमिका अतिशय चांगल्या पद्धतीने निभावत होते. मात्र काँग्रेसमध्ये गटबाजीच्या राजकारणाला कंटाळून आणि भाजपची मोदी लाट लक्षात घेता त्यांनी काही वर्षांपूर्वी भाजपात प्रवेश केला होता.
समीर देसाई हे २००२ ते २०१२ या कालावधीत काँग्रेसचे नगरसेवक होते. त्यांची पत्नी श्रीमती राजुल समीर देसाई या सध्या भाजपकडून नगरसेविका आहेत. त्या २०१७ च्या पालिका निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार लोकना चव्हाण यांचा साडेतीन हजार मतांच्या जोरावर पराभव करून विजयी झाल्या.
आता समीर देसाई हेच शिवसेनेत आल्याने त्यांचा प्रवेशही सुनिश्चित मानला जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे आता भाजपला समीर देसाई आणि श्रीमती राजुल देसाई यांची उणीव भरून काढण्यासाठी वेगळे प्रयत्न व रणनीती अवलंबवावी लागणार आहे.